मंचर-आंबेगाव तालुक्यात हातावर पोट असणारे मजूर किंवा जे विद्यार्थी भाडेकरु म्हणून राहत असतील. तर त्यांच्याकडुन एक महिन्याचे घरभाडे वसुल करावयाचे नाही, असा इशारा तहसिलदार रमा जोशी यांनी दिला आहे.
राज्याबाहेरुन तसेच परजिल्ह्यातून आलेले मजूर, विद्यार्थी, कारागीर, वेठबिगार, घरकाम करणारे, भाडेकरु, बांधकाम मजूर यांच्यावर कोणत्याही प्रकारे बळजबरी करुन त्यांनी स्थलांतरीत करावे, असे कृत्य करु नये. त्यांच्या निवारा, भोजन आणि आरोग्याची व्यवस्था ही संबंधित ठेकेदार, मालक, हॉटेल मालक, कारखाना, संस्था चालक, व्यावसायिक इत्यादींनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये करावयाची आहे. सदर आदेशाची अवहेलना केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड सहित मधील कलम 188 अन्वये घरमालकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार रमा जोशी यांनी दिला आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे राज्याबाहेरील तसेच परजिल्ह्यातुन आलेले विद्यार्थी, मजूर, कारागीर, वेठबिगार, घरकाम करणारे, भाडेकरु, बांधकाम मजूर आदींची त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होऊन सामाजिक अंतर राखण्यास बाधा पोहोचत आहे. याची नोंद घेवून सर्वांनी मानवतेच्या भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.