- “निसर्ग’चा पंचनामा : फूल उत्पादकांना साडेचार कोटींचे नुकसान
- 59.48 हेक्टरवरील हरितगृहांचे कागद फाटले
- अंदाजे 80-90 हेक्टर आंबा बागांना फटका
पिंपरी – मावळ तालुक्यातील शेतकरी भातपिकाच्या तयारीत असताना निसर्ग चक्रीवादळाने “एण्ट्री’ काहीशी सुखावह वाटली तरी या वादळाचा फटका मावळातील 59.48 हेक्टरवरील “पॉलिहाऊस’ला (हरितगृह) बसला. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाने तालुक्यातील सुमारे 300 पॉलिहाऊस झळ सोसावी लागली, काही फूलशेती उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी पॉलिथीनचे कागद फाटल्यामुळे उत्पादकांपुढे संकट कोसळले. मावळात साडेचार कोटींचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
“निसर्ग’ वादळामुळे अलिबागच्या किनाऱ्याला बुधवारी (दि. 3) चांगलेच झोडपले. त्यानंतर या वादळाने पुण्याच्या दिशेने वाटचाल केली. त्यावेळी या वादळाचा मावळ तालुक्याला मोठा फटका बसला. लोणावळा, कामशेत, पवनानगर, वडगाव, तळेगाव, देहूरोड यासह आंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ या ग्रामीण मावळाला त्याची मोठी झळ बसली. या भागात असलेल्या आंब्याच्या बागा, याशिवाय फूल उत्पादकांचे पॉलिहाऊस वादळाने उद्ध्वस्त केले. त्यानुसार कृषी विभागाने प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर आंबा आणि पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसाचा फटका आंबा बागांना बसला. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मावळातील 80-90 हेक्टर बागांचे नुकसान झाले. याशिवाय 59.48 हेक्टरवरील पॉलिहाऊस फटका बसला. पॉलिहाऊसचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तालुक्यातील 26 गावांतील 137 शेतकऱ्यांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. अर्थात वादळाने 4.46 लाख रुपयांचे पॉलिथीनचे कागद फाडले. त्यामुळे मावळातील फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
“पॉलिहाऊस’ला शासकीय मदत नाही
सोसाट्याच्या वाऱ्याचा मावळ तालुक्यातील अंदाजे 300 पॉलिहाऊसला फटका बसला आहे. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला दिसतो. मात्र प्रत्यक्षात पॉलिहाऊस उभारणीसाठी शासकीय अनुदान मिळते. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पॉलिहाऊसचे नुकसान झाल्यावर त्यासाठी शासकीय तरतूद नाही, ही बाबही अधोरेखित झाली आहे.
पॉलिहाऊस हा मावळ तालुक्याचा आधार समजला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात तालुक्याला वेगळी ओळख आहे. या भागात हजारो पॉलिहाऊस आहेत. एवढच नाही, तर महाराष्ट्राच्या तुलनेत फूल उत्पादक शेतकरी अधिक आहेत. लॉकडाऊन आणि वादळामुळे तालुक्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय आंब्याच्या बागांही नष्ट झाल्या आहेत. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे आणि शेतकरीनिहाय सर्वेक्षण दोन दिवसांत पूर्ण केले जाईल. संयुक्त पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविला जाईल.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.