लोणी काळभोर – थेऊर ( ता. हवेली ) येथील गेली १० -११ वर्षे बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील अवसायक नियुक्त करण्याचा आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रद्द केला असून त्यामुळे आगामी काळात कारखाना सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.
या संदर्भात कारखान्याचे सभासद बाजीराव भालसिंग ( कोलवडी), संजय बो-हाडे ( वाडे बोल्हाई ), नितीन मेमाणे ( अष्टापूर ), सतीश शितोळे ( न्हावी सांडस ) व रामभाऊ काळभोर ( लोणी काळभोर ) या उस उत्पादक शेतक-यांनी पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक ( साखर ), कारखान्याचे अवसायक व महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांच्या विरोधात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर पुनरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन सहकार मंत्र्यांनी वरील आदेश दिला आहे. सुनावणीस अर्जदारांच्या वतीने अॅड. शंतनु खुर्जेकर व प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे उपस्थित होते.
अर्जदारांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला कि सन २०१० – ११ पर्यंत कारखाना सुरळीत चालू होता. गैर व्यवस्थापनामुळे एप्रिल २०११ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकाने नोव्हेंबर २०११ मध्ये सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन कारखान्याची अतिरिक्त जमीन विक्री करून सन २०१२ – १३ च्या गळीत हंगामात कारखाना सुरू करायचा असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
मात्र जमिनीला योग्य भाव न मिळाल्याने जमीन विक्री झाली नाही. तेव्हापासून कारखाना बंदच आहे. कारखान्याचे २११९६ सभासद असून ४०० सहकारी संस्था कारखान्याच्या सभासद आहेत. कारखान्याची प्रतिदिन ३५०० मेट्रीक टन गाळप क्षमता असून एका हंगामात कारखान्याला साडे पाच लाख मेट्रीक टन उसाची गरज असते. कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेसह इतर बॅन्काचे एकूण ४८१९. ७७ लाख रुपये कर्ज आहे. प्राॅव्हीडंड फंड, पाणी पट्टी, सरकारी कर, कामगारांची व उस उत्पादकांची देणी २२७१५.६८ इतक्या रकमेची आहे.
मात्र प्रशासक, अवसायक व राज्य सहकारी बॅन्क यांनी जमीन विक्री करून कारखाना सुरू करण्या संदर्भात कुठलेही ठोस प्रयत्न केले नाहीत. कारखान्याची दररोज तीस किलोलिटर क्षमतेचा आसवणी प्रकल्प आहे. तो सुरु करण्यासाठी ही प्रयत्न झाले नाहीत. म्हणून नोव्हेंबर २०१७ रोजी पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) यांनी जारी केलेला अवसायक नियुक्तीचा आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील रद्द केला आहे. त्यामुळे आगामी काळात थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना परत सुरु होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.