जळगाव – जळगावातील पाचोरा येथे काल रविवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यासोबतच निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. ‘खरी शिवसेना कोणती हे जाणून घ्यायचं असेल तर पाकिस्तानला विचारा, पाकिस्तानही सांगेल. मात्र निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे त्यामुळे त्यांना ते दिसत नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
“या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. येथील कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. पण हा त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडून देणारे आजही माझ्यासोबत
“निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत. या गर्दीला नुसता अर्थ नाही. लोकं आता बोलायला लागले आहेत,”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “काही जणांना असे वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार असं काहीजण वल्गना करतात, पण निवडणुकीत त्यांच्या शेपटी आदळून त्यांची जागा दाखवावी. आज आर ओ पाटलांची उणीव भासते, एक कणखर आणि विश्वासू सहकारी जाणं हे परवडणारं नाही. अगदी चाळीस गद्दार जरी गेले तरी चालतील, पण एक विश्वासू सहकारी जाणं परवडत नाही,” अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.