वाल्हे: (ता.पुरंदर) येथे मंगळवार दुपार नंतर पावसाच्या सरी कमी- जास्त प्रमाणात कोसळत आहेत. आज सकाळपासूनच या भागामध्ये जोरदार वारे वाहत असून, पावसाची संततधार सुरुच आहे. पाऊस पेरणी उपयोगी झाल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, जोरदार वाहत असलेल्या वाऱ्याने जनावरांचा ओला चारा मका, कडवळ, हत्ती घास, ही चारा पीके जमीनदोस्त झाली असल्याने, शेतकरी वर्गासमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच, या भागामधील फळबागांची मोठ्या प्रमाणावर फुले तसेच फळे मोठ्या प्रमाणावर गळत आहेत. तसेच भेंनुगांच्या शेंगाना शेतामध्ये गरजेपेक्षा पाणी जास्त झाल्याने त्यांना करे उगवण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आत्ता सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे काही शेतकरी, पेरणी करता येईल म्हणून खुश तर काही शेतकरी आत्ता होत असलेल्या नुकसानीमुळे चिंतेत आहेत.
वाल्हे परिसरामध्ये या पावसाने सखल भागामध्ये बहुतांश ठिकाणी तळ्यांचे स्वरूप झाल्याचे पहिवयास मिळत आहे. तसेच पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाला वीर, मांडकी, पिंगोरी आदी गावांना जोडणारा रस्ता दयनीय झाला आहे.