Cyclone Remal – बंगालच्या उपसागरात तयार होणारे रेमल चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमधील किनारपट्टीला धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रेमल असे या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी 102 किमीच्या वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तर पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल.
हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतरित होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी मध्यरात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रुपात पोहोचेल.
रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना 27 मे पर्यंत किनाऱ्यावर परतण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळे त्यांचा वेग अधिक वेगाने वाढवत आहेत आणि त्यांची ताकद जास्त काळ टिकवून ठेवत आहेत, परिणामी महासागर हरितगृह वायू उत्सर्जनातील बहुतांश अतिरिक्त उष्णता शोषून घेतात, त्याचा याचा परिणाम दिसून येत आहे.
तर शास्त्रज्ञांच्यानुसार, १880 मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून गेल्या 30 वर्षांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांच्या हवाल्यातून पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राच्या पृष्ठभागावरील उबदार तापमानाचा अर्थ अधिक आर्द्रता आहे, जे चक्रीवादळांच्या तीव्रतेसाठी अनुकूल आहे.