पटीयाला – पंजाबमधील पटीयाला येथे शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी शिवसैनिक आणि मोर्चा विरोधक यांच्यात तुफान राडा झाला. मोर्चा काढणाऱ्या शिवसैनिकांवर विरोधकांनी दगडफेक करत तलवारी उपसल्या. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे पंजाबमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही पक्षांनी शांततेतून चर्चा करत हा प्रश्न सोडवावा असा संदेश सर्वच पक्षांनी दिला आहे.
पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हरिश सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे नागरिक जमा झाले होते. मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक जात असताना अचानक त्यांच्यावर शीखांच्या एका गटाकडून दगडफेक करण्यात आली.
या मोर्चादरम्यान काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत वाद झाला. दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. शिवसैनिक मुर्दाबादच्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.
शांतता बाळगण्याचे आवाहन
पतियालामध्ये घडलेला प्रकार दुर्देवी आहे. मी डीजीपींसोबत बोललो आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यावर आमचं लक्ष आहे. पंजाबची शांतता सर्वात महत्वाची आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले. या प्रकरणानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन करत आपापसातील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्यास सांगितले.