श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्याचे पाटपाणी पळवून श्रीरामपूर तालुक्याचे वाटोळे करणाऱ्या विखेंनी श्रीरामपूरबद्दल खोटा कळवळा दाखवून आपल्या पापावर पांघरुन घालण्याचे उद्योग करू नयेत. विखे यांचे श्रीरामपूरबद्दलचे पुतना- मावशीचे प्रेम श्रीरामपूर तालुका ओळखून असल्याचे प्रत्युत्तर माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिले.
मी श्रीरामपूरच्या एमआयडीसीला विरोध केला, हा अपप्रचार आहे. आपला विरोध एमआयडीसीला नव्हता, तर मी आमदार असून माझे नाव निमंत्रण प.ित्रकेत डावलून शिष्टाचार पाळला नाही यास होता, ही वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असा टोला माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी लगावला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मी एमआयडीसीला विरोध केल्याचा आरोप केला. हा आरोप बिनबुडाचा व निराधार आहे. मी श्रीरामपूरचा काँग्रेसचा आमदार असताना सन १९८३ मध्ये काँग्रेसचे स्व.रामराव आदिक हे तत्कालीन उपमुख्यमंञी तथा उद्योगमंत्री होते. तर मी श्रीरामपूर मतदा संघाचा काँग्रेसचाच आमदार होतो.
एमआयडीसीच्या शुभारंभाच्या प.ित्रकेत स्व.रामराव आदिक व मी असे दोघेही काँग्रेसचे असतानाही माझे नाव डावलून वैजापूरचे तत्कालीन आमदार स्व.गोविंदराव आदिकांचे नाव टाकण्यात आले. हा शासकीय शिष्टाचाराचा भंग तसेच श्रीरामपूरच्या जनतेचा अवमान होता. यामुळे या प्रकारास आपण विरोध केला होता. नवीन पिढीला हा खरा इतिहास माहित व्हावा व दिशाभूल होऊ नये, यासाठी आपण हा खुलासा करीत आहोत.
जे माझ्यावर आरोप करतात, त्या राधाकृष्ण विखे यांचे वडील चाळीस वर्षे खासदार होते. त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे हे सन १९९६ पासून आजवर विविध मंञीपदे, जिल्ह्याचे पालकमंञी पदे उपभोगित आहेत. श्रीरामपूरच्या जनतेने त्यांना मते दिलेली आहेत. असे असताना विखे यांनी श्रीरामपूरच्या एमआयडीसीत उद्योगधंदे का आणले नाहीत ? तसेच आपल्या शिक्षण संस्थेमार्फत एखादे महाविद्यालय श्रीरामपूर येथे का सुरू केले नाही, असा सवालही मुरकुटे यांनी उपस्थित केला.