हैदराबाद – ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे आज निधन झाले आहे. ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायका आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या मालिनी राजूरकर यांनी 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी अजमेर येथे झाला. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकवल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांमध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली.
मालिनीताईंचे टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. “नरवर कृष्णासमान’ आणि “पांडू-नृपती जनक जया’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली.
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. त्यांनी 1980 साली अमेरिकेत आणि 1984 साली इंग्लंडमध्ये संगीत दौरे केले होता. 1970 पासून त्या हैदराबाद येथे राहात होत्या. मालिनीताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना 2001मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2008मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
“ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांच्या निधनाने आपण एका महान गायिकेला, संगीतकाराला इतकेच नव्हे तर संत सदृश्य विभूतीला मुकलो आहोत. त्यांच्या गाण्याने त्यांनी वर्षानुवर्षे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली सेवा रुजू केली आणि रसिकांना आनंद दिला. त्यांना थोडे बहुत ओळखणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या संन्यस्त वृत्तीने थक्क व्हायला होत असे. पैसा आणि मानसन्मान यांचा मोह नसलेले एक सांगीतिक व्यक्तिमत्व असेच त्यांचे वर्णन करता येईल. गायनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या जेव्हा पहिल्यांदा सवाईला गायल्या तेव्हा त्या आई होणार होत्या. त्या परिस्थितीत भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी त्यांना स्वत: तंबोरे लावून देत धीर दिला, अशी आठवण त्या कायम सांगायच्या. मालिनी राजूरकर यांना आपच्या परिवाराच्यावतीने आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.” – श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
“मालिनी राजूरकर यांचे व्यक्तीमत्त्व हे आपल्या घरातील आई आणि आजी सारखे लोभस होते. प्रामाणिकपणा यांच्या व्यक्तिमत्त्वात ओतप्रोत भरला होता. त्यांच्या सारखे गाणे होणे नाही. साधे सोपे तरीही गायला कठीण अशा पद्धतीचे त्यांचे गाणे होते. टप्पा, नाट्यगीत याबरोबरच ग्वाल्हेर घराण्याची शास्त्रीय आणि परिपूर्ण गायकी त्यांच्या गळ्यात होती. मी प्रत्येक खेपेला लक्ष्मी कलामंदिरला त्यांचे कार्यक्रम लाइव्ह ऐकले आहेत. त्या अनेकदा आमच्या घरी जेवायला आल्या होत्या. त्या कायम माझे भरभरून कौतुक करायच्या. त्यांचा प्रामाणिक, सोज्वळ सूर आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही ही खंत आहे. त्यांना श्रद्धांजली!” – राहुल देशपांडे, शास्त्रीय गायक