– माधव विद्वांस
ज्यांच्या नावातच प्रेम आहे, असे प्रेमगीते, राष्ट्रभक्तीपर गीते लिहिणारे, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते प्रेम धवन यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 13 जून 1923 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लाहोर येथेच झाले. प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी हे त्यांचे वर्गमित्र होते तसेच भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे त्यांना ज्येष्ठ विद्यार्थी होते. साहिर लुधियानवी आणि प्रेम धवन हे विद्यार्थी युनियनचे सक्रिय कार्यकर्ते होते. दोघांनीही कॉलेजच्या नियतकालिकामधून लिखाण केले. साहिर लुधियानवी गझल रचत असत आणि प्रेम धवन गाणी लिहीत असत. त्याचवेळी प्रेम धवन यांनी नंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिक्षणानंतर ते “पीपल्स थिएटर ग्रुप’मध्ये रुजू झाले. त्यामधून त्यांनी चार वर्षे नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षण घेतले. यावेळी पंडित रविशंकर यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळाले. ख्वाजा खुर्शीद अन्वर यांच्याकडे सहाय्यक संगीतकार म्हणून “आज और कल’ या चित्रपटासाठी काम केले. त्यांचा “थिएटर ग्रुप’ विस्कळीत झाला तेव्हा लाहोर येथील लेखिका इस्मत चुगताई बॉम्बे टॉकीजमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांनी प्रेम यांना वर्ष 1949 मधे “जिद्दी’ हा चित्रपट गीत लेखनसाठी मिळवून दिला. त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 33 चित्रपटांसाठी गीते लिहिली व 16 चित्रपटांना संगीतही दिले तसेच 9 चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले.
प्रेम धवन गीतकार म्हणून ओळखले जात होते; पण त्यांनी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले होते हे फारच थोड्या लोकाना माहिती आहे. तसेच त्यांनी काही चित्रपटांत नृत्यही केले आहे. “दो बिघा जमीन’ चित्रपटातील “हरियाला सावन ढोल बजाता आया’ या गाण्यामध्ये प्रेम यांनी नृत्य केले आहे. “नया दौर’ हा त्यांच्या नृत्य दिग्दर्शनाचा सर्वाधिक हिट चित्रपट होता, त्यातील सर्व गाणी त्यांनी दिग्दर्शित केली आहेत.
“एक फुल दो माली’ या चित्रपटातील “तुझे सुरज कहूँ या चंदा’ हे गीत प्रेम यांनीच लिहिले. हे गाणे रचताना ते गहिवरले होते. “ए वतन, ए वतन’ चित्रपटातील मोहमद रफी यांनी गायलेले गीत त्यांनीच केले तसेच संगीतबद्धपण केले. तसेच “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं’ सारखी उत्कृष्ट गाणी संगीतबद्ध करणारे प्रेम धवन यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकारांमध्ये नेहमीच घेतले जाते. मनोजकुमार हे प्रेम यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्याबद्दल त्यांनी आठवणीत सांगतले आहे, जेव्हा मी “शहीद’ चित्रपटासाठी प्रेम धवनकडे गेलो होतो तेव्हा मी म्हणालो की, “शहीद’ चित्रपटासाठी तू संगीत द्यावेस.
त्यावर तो म्हणाला, तू काय बोलत आहेस. मी संगीत कसे देऊ? माझी डाळ रोटी तर गाणी लिहून चालत आहे. त्यावर मनोजकुमार म्हणाले, मी चित्रपट बनवतोय. जर तुम्ही संगीत दिले नाही तर मी चित्रपट बनवणार नाही. मग त्यांनी त्यांचा आग्रह मान्य केला. “शहीद’ चित्रपटाची सर्व गीते त्यांनी संगीतबद्ध केली तसेच त्यातील 4 गीतेही त्यांनीच लिहिली. “शहीद’ चित्रपटाची गाणी अजरामर झाली. आरजू, मिस बॉम्बे, काबुलीवाला, पवित्र पापी, शहीद या सारख्या प्रसिद्ध चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिले. 7 मे 2001 रोजी मुंबईतील जसलोक रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.