पारनेर – तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागला असून, लवकरच शेतकरी,सभासद कारखान्याचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी जनजागृती मोहीम कारखाना बचाव समितीने हाती घेतलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात गावोगावी बचाव समिती बैठकांचे आयोजन करून जनजागृती करत आहे.
तालुक्यातील उत्तरेकडील बागायती पट्टा असलेला मांडवे खुर्द परिसर येथे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मांडवे, देसवडे, तास, वनकुटे परिसरातून शेतकरी सभासद हजर होते.
पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाचा वापर करून पुणे येथील क्रांती शुगर या खासगी कंपनीने कसा बळकावला आहे, याची सविस्तर माहिती या वेळी सभासदांना देण्यात आली. कारखाना विक्रीमागे कोणाचा हात होता? तो का विकण्यात आला? व त्यामुळे पारनेरकरांवर कसा अन्याय करण्यात आला, याची सविस्तर माहिती बचाव समितीचे रामदास घावटे यांनी या वेळी दिली. कारखान्याविषयीचे विविध खटले सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असून, ते निकालाच्या अंतिम टप्प्यात आहेत, याचीही माहिती घावटे यांनी सभासदांना दिली.
या वेळी बबनराव सालके यांनी, पारनेर साखर कारखान्याचे आता पुनर्जीवन होत असून, कारखान्याचे सुमारे 20 हजार सभासद आहेत. त्यांचे सभासदत्व आता जिवंत होणार असल्याची माहिती दिली.
पारनेर साखर कारखान्याच्या अंतिम टप्प्यातील लढाईत मांडवे खुर्द परिसर सदैव बचाव समितीच्या पाठीशी राहून साथ देईल, असे आश्वासन येथील ऊस बागायतदार जगदीश गागरे यांनी दिले.
कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत समितीचा विजय झाला आहे. आता या पुढील लढाईत बचाव समितीला पूर्ण साथ द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी या वेळी केले. ताबा घेतेवेळी कुणी हरकत, अडथळा निर्माण केला तर जशाच तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केली. या वेळी पारनेर कारखाना बचाव समिती व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.