Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! राष्ट्रपतींच्या हस्ते ‘या’ खास पुरस्काराने सन्मानित

Vaibhav Suryavanshi honoured with Rashtriya Bal Puraskar : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि बिहारचा १४ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मैदानातील आपल्या अष्टपैलू आणि धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर वैभवने केवळ देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैभवला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक खेळी –
वैभव सध्या प्रचंड फॉर्मात असून विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने बिहारकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ऐतिहासिक खेळी साकारली होती. त्याने केवळ ८४ चेंडूंमध्ये १९० धावा कुटल्या, ज्यामध्ये १६ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. याच पुरस्कार सोहळ्यासाठी वैभवला दिल्लीला उपस्थित राहायचे असल्याने, तो मणिपूरविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.
VIDEO | Delhi: Young cricketer Vaibhav Suryavanshi conferred with Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar.
(Source: Third Party)#VaibhavSuryavanshi
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/JrKqy7ziTN
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2025
आयपीएलमधील विक्रम आणि राजस्थान रॉयल्सची साथ –
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली आहे. तो राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून संघाने त्याला कायम (Retain) ठेवले आहे. आयपीएल २०२५ मध्ये ७ सामन्यात २५२ धावा फटकावून तो चर्चेत आला होता. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. भारत-अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघातही त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा – Rohit Sharma Duplicate : कोण आहे रोहित शर्माचा डुप्लिकेट? ज्याचा ‘हिटमॅन’सोबतचा फोटो होतोय तुफान व्हायरल
‘वीर बाल दिनी’ सोहळ्याचे आयोजन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रसंगी मुलांच्या प्रतिभेचे कौतुक करताना सांगितले की, “कला, संस्कृती, पर्यावरण, विज्ञान आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत तुम्ही केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.” हा सोहळा ‘वीर बाल दिना’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०२२ रोजी घोषणा केल्यानुसार, गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या (साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग) बलिदानाच्या स्मृतीप्रत्यर्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वैभवला मिळालेला हा सन्मान बिहार आणि भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद मानला जात आहे.





