श्रीगोंदा – नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत या तीन तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले आहे. यामुळे प्रकल्पातील डिंभे आणि वडज ही दोन धरणे “ओव्हरफ्लो’ झाली आहेत. प्रकल्पात नवीन दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आता प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 81 टक्के झाला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात काहीसा पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली. यामुळे कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने या प्रकल्पातील पाणीसाठ्यात दोन टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. यामध्ये डिंभे धरणात नव्याने एक टीएमसी पाणी आले. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. परिणामी, घोड नदीपात्रात 3 हजार 720 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा नऊ टक्क्यांनी कमी आहे. गेल्यावर्षी 10 सप्टेंबर अखेर 26 हजार 785 एमसीएफटी (90 टक्के) पाणीसाठा होता. यंदा 23 हजार 929 एमसीएफटी (81 टक्के) पाणीसाठा आहे. यावर्षी मात्र लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने येडगाव धरणातून कुकडी कालव्यात 4 हजार 883 एमसीएफटी पाणी आतापर्यंत सोडण्यात आले आहे. येडगाव धरण 501 एमसीएफटी 26 टक्के, माणिकडोह 6 हजार 962 एमसीएफटी 68 टक्के, वडज 1 हजार 162 एमसीएफटी- 99 टक्के, पिंपळगाव जोगे 2 हजार 999 एमसीएफटी 77 टक्के, विसापूर 231 एमसीएफटी 26 टक्के असा धरणांमधील पाणीसाठा आहे.
सोमवारपासून (दि.11) पाणी सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.8) श्रीगोंदा येथील कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, भाऊसाहेब डांगे आदी उपस्थित होते.