राहाता – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालवातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा चाचणी करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी कालव्याचे काम खोदकाम करतांना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले तसेच काही भागातील खडक सछिंद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे अकोले तालुक्यातील निळ, म्हाळादेवी, मेहंदुरी व कळसच्या भागामध्ये कालवा तळातील खडकामधील सपामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीच्या वेळी निदर्शनास आले होते. आता या त्रुटींची दुरुस्त तातडीने करण्यात येत असून ती झाल्यानंतर निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले.
निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आली होती. निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील शाखा कालव्यांच्या शेवटपर्यंत केवळ 12 दिवसांमध्येच सुमारे 120 कि.मी. लांबीत यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते. प्रकल्पाचा डावा कालवा कि. मी. 2 ते 28 हा अकोले तालुक्यातील निवळ, म्हाळादेवी मेहंदुरी व कळस या भागातून जातो.
तालुक्यातील भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यामुळे काही लांबीत एका बाजूला डोंगर व कठीण खडकातील खोदाई व दुसऱ्या बाजूला 14-15 मीटर उंचीचे माती भराव काम करून कालव्याचे काम करण्यात आलेले असल्याने सदर ठिकाणी कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले, तसेच काही भागातील खडक सछिद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे अकोले तालुक्यातील निळ, म्हाळादेवी, मेहंदुरी व कळसच्या भागामध्ये कालवा तळातील खडकामधील सपामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीच्या वेळी निदर्शनास आले होते. याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली आहे.
कालव्याची दुरूस्ती न करताच पाणी सोडल्यास व पुन्हा पाझर झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो. याबाबत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिले आहे. हीबाब लक्षात घेवून कठीण खडकाच्या भागामध्ये कालवा तळात आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे. मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाय योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मंत्री विखे यांनी दिल्या आहेत.
अकोले तालुक्यात पावसामुळे काळी माती उपलब्ध होण्यास व कॉक्रिटचे काम शीघ्रगतीने करण्यास अडचण निर्माण होत असल्याने हे कामे लवकर पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे सांगतानाच पावसाने उघडीप दिल्यास उपरोक्त कामे पूर्ण करून, क्रॉस रेग्युलेटर व रिटेनिंग वॉलचे काम सुरक्षित पातळीपर्यंत आणून आवश्यकता भासल्यास मोठी गळती असंतोष्याच्या भागात प्लास्टिक कागदाचा वापर करण्याच्या सूचनाही अधिकार्यांना विखे पाटील यांनी दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.