हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – जिल्ह्यात २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला. यात अनेक वृक्षांचे नुकसान झाले तर अनेक वीजवाहिन्या देखील कोसळल्या. काही ठिकाणी वीज खांब वाकल्याचे देखील आढळून आले. सुमारे अर्ध्या तासाच्या या अवकाळीने प्रचंड नुकसान झाले आहे.
यंदा अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसून, एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधूनमधून वादळवाऱ्यासह पाऊस झाला. या.अवकाळीत हळदीसह फळबागा आडव्या झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अचानक वादळवाऱ्यासह पाऊस कोसळला. वादळवाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने.हिंगोली शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.
तसेच अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. तर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला. हिंगोलीसह सेनगाव,.पुसेगाव, जांभरूण रोडगे, नर्सी नामदेव, डिग्रस कन्हाळे भागातही वादळवाऱ्यासह पाऊस झाला.
वीजवाहिन्यांचे काम सुरु
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर,.जुनी नगर पालिका, इंदिरा गांधीचौक, जवाहर रोड, तसेच इतर भागात वीज वाहिन्या तुटल्या महावितरणकडून.दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हे काम सुमारे सात ते आठ तास चालेल अशी माहिती उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी दिली.