नवी दिल्ली -लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. तसे पत्र मोर्चाने थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवले आहे.
दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने संबंधित प्रकरणावरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल आणि जातीय विद्वेष पसरवत असल्याबद्दल मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा.
मिश्रा यांच्या मुलाला तातडीने अटक केली जावी, अशा मागण्याही पत्रातून करण्यात आल्या आहेत. हिंसाचार प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवली जावी. त्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाने देखरेख ठेवावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधी वक्तव्यांबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही पदावरून हटवण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्या राज्यांतील वातावरणही ढवळून निघाले आहे.