अरुण गोखले
काही व्यक्ती या किती तत्त्वनिष्ठ असतात, नि:स्वार्थी असतात याचं एक उदाहरण म्हणजे चाणक्य. एक दिवस काय झाले, चाणक्यांना भेटण्यासाठी चीनमधून एक खास पाहुणा आला. त्या दोघांची ती भेट काही पूर्वनियोजित अशी नव्हती त्यामुळे काय झाले की, जेव्हा तो पाहुणा चाणक्यांना भेटायला आला त्यावेळी चाणक्य हे कसल्या तरी खास कामात गर्क होते. तरीसुद्धा आपल्याला भेटण्यासाठी कुणी पाहुणा आपल्या घरी आला आहे हे जाणून त्यांनी हसतमुखाने त्या पाहुण्याचे स्वागत केले. हातानेच त्यास जरा बसा, अशी खूणही केली. ती व्यक्ती चाणक्यांनी दाखविलेल्या जागी शांतपणे बसली. त्याकाळी तेलाच्या दिव्यांचा वापर केला जायचा. चाणक्यांसमोर एक नव्हे तर चक्क दोन दिवे होते. त्यातला एकच दिवा लावलेला होता आणि त्या दिव्याच्या उजेडातच त्यांचे काम चालू होते.
दुसरा दिवा असूनही लावलेला नव्हता. हे असं का बरं? असा विचार त्या चिनी पाहुण्याच्या मनात येत असताना चाणक्यांनी आपल्या हातातले काम संपवले. त्या पाहुण्याकडे पाहून हसत हसत त्यांनी तो चालू असणारा दिवा मालवला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी शेजारीच ठेवलेला दुसरा दिवा लावला. चाणक्यांच्या त्या कृतीने चिनी पाहुण्याला मोठे आश्चर्य वाटले. एकीकडे त्याला असेसुद्धा वाटले की घरी आलेल्या पाहुण्याचे नवा दिवा लावून स्वागत करण्याची ही एक नवी पद्धत असेल. आपल्या मनातील त्या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी चिनी पाहुण्याने विचारले, “”चाणक्यजी! घरी आलेल्या पाहुण्याचे नवा दिवा लावून स्वागत करण्याची तुमच्याकडे पद्धत आहे का?”
चाणक्य म्हणाले, “”नाही, तशी काही आमच्याकडे पद्धत नाही. पण मला वाटतं की तुमच्या मनात हीच शंका आहे ना, की मी तो दिवा का बंद केला आणि हा दिवा का लावला?” “”हो, ती तर शंका आहेच?” त्या चिनी पाहुण्याने कबुली दिली. तेव्हा आपल्या त्या कृती मागचे कारण स्पष्ट करताना चाणक्य म्हणाले, “”मी मघाशी जे काम करत होतो ते माझ्या राष्ट्राचे होते. तो पहिला दिवा हा मला त्या कामासाठीच दिला गेलेला असल्याने मी तो त्या कामासाठीच वापरायला हवा, नाही का? कारण त्यात जे तेल वापरले होते, ते राष्ट्राच्या पैशाचे आहे. ते काम झाले म्हणून मी तो दिवा बंद केला.
आता आपली भेट, आपला संवाद, बोलाचाली या माझ्या वैयक्तिक बाबी आहेत. त्यासाठी मी राष्ट्राचा दिवा जाळायचा हे योग्य नाही. म्हणूनच मी तो दिवा बंद केला आणि माझ्या पैशातून ज्यात तेल घातलेले आहे, तो दिवा लावला. मला वाटतं की मी यात काही चूक केलेली नाही. नाही का?” तो चिनी पाहुणा काय उत्तर द्यायचे, या विचारात पडला. एखादी व्यक्ती स्वत:बरोबरच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचाही इतका काटकसरीने वापर करते, हे पाहून तर तो अधिकच भारावून गेला. नि:स्वार्थपणा आणि तत्त्वनिष्ठा म्हणजे नेमकं काय? हे त्याला चांगलेच कळून चुकले.