Todays Top 10 News: विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी; राज्यसभेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांची उमेदवारी जाहीर केलीय. पक्षसंघटनेत सक्रिय असलेल्या विनोद तावडेंचे या निमित्ताने मुख्य प्रवाहात पुनरागमन झाले असून, रामदास आठवलेंना सलग तिसऱ्यांदा संधी देऊन भाजपने मित्रपक्षाला साथ दिलीय. तसेच धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते आणि आदिवासी नेत्या माया इवनाते यांना संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधली आहेत. १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील सात जागांसाठी मतदान होणार असून, ५ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्त – भाजपकडून दोन नव्या चेहऱ्यांना संधी; कोण आहेत माया ईवनाते आणि रामराव वडकुते? सविस्तर वृत्त – भाजपकडून राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची नावं जाहीर; रामदास आठवलेंना दिली पुन्हा संधी भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर; इंधनाचे दर स्थिर राहणार : फडणवीस आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रासह देशातील नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या मोहिमेची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली असून, हेल्पलाईन व व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे बाधितांशी संपर्क साधला जातोय. एअर इंडियाच्या विमानांद्वारे टप्प्याटप्प्याने नागरिकांना आणले जात असून दूतावासांशी समन्वय सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीची भीती फडणवीस यांनी फेटाळून लावली. देशात सध्या दोन महिन्यांचा तेल साठा उपलब्ध असल्याने किमतीत तातडीने वाढ होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. गोविंददेव गिरींच्या विधानावरून संताप; वारकरी संप्रदायातून माफीची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी यांनी संत साहित्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय. संतपरंपरेत केवळ ‘दासबोध’ हाच स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत ही केवळ भाष्ये आहेत, तसेच संत तुकाराम महाराजांची गाथा हे संकलन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या वक्तव्यामुळे वारकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, संतपरंपरेचा अवमान केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून, आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात यावर आक्षेप घेत गोविंददेव गिरींनी माफी मागावी अशी मागणी केली. संभाजी ब्रिगेडनेही यावर कडक शब्दांत टीका केलीय. वारकरी संघटनांनी देखील या विधानाचा निषेध केला असून, आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या ग्रंथांची अशी तुलना अयोग्य असल्याचे म्हटलेय. अजित पवारांनी रोखलेले राजीनामे अखेर मंजूर; राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदलांचे वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, त्यांनी प्रलंबित ठेवलेले अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे आता मंजूर करण्यात आलेत. मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी आणि सचिन जाधव या पदाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी रोजीच अजित पवारांकडे राजीनामे सुपूर्द केले होते, मात्र त्यावेळी दादांनी त्यांना स्थगिती दिली होती. आता त्यांच्या जाण्यानंतर हे राजीनामे तातडीने स्वीकारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत या नेत्यांनी पदत्याग केला होता. संघटनेत सहकार्य मिळत नसल्याचा आरोप या पत्रांतून करण्यात आला होता. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात होत असलेल्या या वेगवान बदलांमुळे अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, आगामी काळात नवीन नियुक्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेय. सविस्तर वृत्त – राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नेत्यांचे राजीनामे मंजूर; सुनील तटकरेंविरोधात नाराजी? शेत रस्त्यांची आता सातबारावर होणार नोंद; मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता शेत रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ रकान्यात केली जाणार असून, यामुळे भविष्यातील रस्त्यांचे वाद मिटण्यास मदत होणार आहे. या रस्त्यांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (GIS) सीमांकन करून त्यांना भू-सांकेतिक क्रमांक दिले जातील. या योजनेसाठी राज्य सरकार सीएसआर (CSR) फंडाचा वापर करणार असून, कामात पारदर्शकता राखण्यासाठी एक विशेष डिजिटल पोर्टल विकसित करण्यात आलेय. या पोर्टलवर रस्त्यांची सद्यस्थिती, निधी आणि कंत्राटदारांची माहिती उपलब्ध असेल. संबंधित मतदारसंघाचे आमदार दरमहा या कामाचा आढावा घेतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम होईल. सविस्तर वृत्त – राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेत रस्त्यांची आता सातबारावर होणार अधिकृत नोंद; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा 65 लाख मतदारांची नावे बाद; ‘SIR’मुळे सत्तासंघर्षाचे गणित बिघडणार? पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) राजकीय वातावरण तापलेय. अंतिम मतदार यादीतून आतापर्यंत तब्बल ६५ लाख नावे वगळण्यात आली असून, सुमारे ६० लाख नावांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. विशेषतः गेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागलेल्या जागांवर यामुळे मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. बलरामपूर आणि दंतान यांसारख्या जागांवर, जिथे गेल्या वेळी हार-जितचा फरक ५०० ते १००० मतांचा होता, तिथे १० ते १९ हजार नावे हटवण्यात आलेत. भाजप या प्रक्रियेला ‘बोगस मतदार हटवण्याची मोहीम’ म्हणत असताना, तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केलाय. प्रलंबित असलेल्या ६० लाख नावांवर आता न्यायालयीन अधिकाऱ्यांचा निर्णय काय येतो, यावर बंगालमधील सत्तेचे समीकरण अवलंबून असेल. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेई यांची नियुक्ती मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोजतबा खामेनेई यांची नवे ‘सुप्रीम लीडर’ म्हणून घोषणा केलीय. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ अंतर्गत अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह ४० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणच्या ‘असेंबली ऑफ एक्सपर्ट्स’ने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेय. मोजतबा हे दिवंगत खामेनेई यांचे पुत्र असून दीर्घकाळापासून पडद्यामागून लष्करी व सुरक्षा यंत्रणांची धुरा सांभाळत होते. या भीषण हल्ल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरू केलेत. मोजतबा खामेनेई यांच्यासमोर आता कोलमडलेली लष्करी व्यवस्था पुन्हा उभी करणे आणि अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त मोहिमेला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. या नियुक्तीमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शेअर बाजारात मोठा भूकंप; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये बुडाले जागतिक तणावाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला असून बुधवारी ४ मार्च रोजी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स १,१२२ अंकांच्या घसरणीसह ७९,११६ वर, तर निफ्टी ३८५ अंकांनी पडून २४,४८० वर बंद झाला. अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पडझडीमुळे बीएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल १० लाख कोटींनी घटलेय. इन्फ्रा, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांची मोठी विक्री झाली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक ६.७६ टक्क्यांची घसरण झाली, तर केवळ भारती एअरटेल, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा हे तीन शेअर वधारले. बाजारात ३,२३७ शेअर्स लाल निशाणीत बंद झाले असून सलग तिसऱ्या दिवशी मंदीचे सावट कायम राहिलेय. सविस्तर वृत्त – शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1122 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले दिग्गज अभिनेते विजय कृष्णा यांचे 81व्या वर्षी निधन; ‘देवदास’मध्ये साकारली होती शाहरुखच्या वडिलांची भूमिका भारतीय रंगमंच आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आपल्या संयत अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा यांनी रंगमंच आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला होता. संजय लीला भंसाली यांच्या ‘देवदास’ चित्रपटात त्यांनी शाहरुख खानच्या वडिलांची (नारायण मुखर्जी) साकारलेली भूमिका विशेष गाजली. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘डांस लाईक अ मॅन’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचेही मोठे कौतुक झाले होते. विजय कृष्णा हे केवळ एक उत्तम कलाकारच नव्हते, तर कॉर्पोरेट जगातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. ते गोदरेज समूहाच्या व्यवसायात कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. अभिनेत्री लिलेट दुबे यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या हजरजबाबी स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने कला आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जातेय. सविस्तर वृत्त – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात हळहळ पाकिस्तान संघात मोठे फेरबदल; बाबर आझमला डच्चू, 6 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कठोर पाऊल उचललेय. आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय वनडे संघातून स्टार फलंदाज बाबर आझम, फखर झमान आणि नसीम शाह यांना डच्चू देण्यात आलाय. शाहीन शाह आफ्रिदीकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय. निवड समितीने भविष्याचा विचार करत अब्दुल समद, माज सदाकत आणि साहिबझादा फरहानसह ६ अनकॅप्ड युवा खेळाडूंना संधी दिलीय. ११ ते १५ मार्च दरम्यान ढाका येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. विश्वचषकातील फ्लॉप शोमुळे बाबरला आपले स्थान गमवावे लागल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. सविस्तर वृत्त – पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! बाबर आझमसह स्टार खेळाडूंना डच्चू; बांगलादेश दौऱ्यासाठी ६ युवा खेळाडूंना संधी