मुंबई – महाराष्ट्रातील तीन महिलांना, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून प्रख्यात महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केन्द्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे. सायली नंदकिशोर आगवणे, वनिता जगदेव बोराडे आणि कमल कुंभार या तिघी महाराष्ट्रातील तीन पुरस्कार विजेत्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन, येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण 29 उल्लेखनीय व्यक्तींना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सायली नंदकिशोर आगवणे या विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना आहेत. सायली नंदकिशोर आगवणे यांना कठीण परिस्थितीतही भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला आहे.
वनिता जगदेव बोराडे पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. वनिता बोराडे यांना त्यांच्या वन्यजीव संवर्धनासाठी विशेषत: सापांची सुटका करणे आणि जनजागृतीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत 50,000 हून अधिक सापांचे प्राण वाचवले असून सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडले आहे. म्हणूनच त्या सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात. भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट जारी करून त्यांचा गौरव केला आहे.
कमल कुंभार या सामाजिक उद्योजिका असून त्यांना पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष योगदानाबद्दल 2021 सालचा नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी 5,000 हून अधिक महिलांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे. त्या ‘कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी दुष्काळी उस्मानाबाद भागातील 3,000 हून अधिक महिलांना मदत केली आहे. त्यांनी कोंबड्याच्या प्रमुख प्रजातींसाठी (चिकन) पोल्ट्री कार्यपद्धतीही स्थापित केली आहेत.
त्यांना पुण्यातील स्वयं शिक्षण प्रयोगाच्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वच्छ उर्जा कार्यक्रमा अंतर्गत ‘वुमन इन क्लीन एनर्जी प्रोग्रॅम’मध्ये “ऊर्जा सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी 3,000 हून अधिक घरे उजळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.