नवी दिल्ली – गुन्हेगारांकडून अनेक सिमकर्ड बाळगून आर्थिक गुन्हे, अनाहुत कॉल करण्याच्या घटना घडत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी दूरसंचार विभागाने प्रतिव्यक्ती फक्त नऊ सिमकार्ड बाळगण्याचे बंधन घातले आहे. भारतामध्ये ज्या व्यक्तीकडे 9 पेक्षा अधिक सिम कार्ड आहेत त्या सिमकार्डची फेरतपासनी करण्याच्या सूचना दूरसंचार विभागाने जारी केल्या आहेत.
जम्मू -काश्मीर, उत्तर- पूर्व राज्य आणि आसामसाठी सिम कार्डची मर्यादा 6 इतकी ठेवण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने 7 डिसेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार ग्राहकांना पाहिजे ती कनेक्शन चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर उरलेली अतिरिक्त कनेक्शन रद्द करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जर भारतातील एखाद्या व्यक्तीकडे 9 पेक्षा जास्त सिमकार्ड असतील आणि काश्मीर, उत्तर- पूर्व आणि आसामातील व्यक्तीकडे 6 पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर त्या सर्व सिमकार्डची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे. मोबाईलचा वापर करून वित्तीय गुन्हेगारी वाढली आहे. त्याचबरोबर ग्राहकांना अवेळी कॉल करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागाने त्याला मर्यादा याव्यात याकरिता या उपाययोजना केल्या आहेत.
जी सिमकार्ड अतिरिक्त आहेत आहेत आणि वापरात नाहीत ती सिम कार्ड रद्द करून ती डाटाबेस मधून डिलीट करण्याच्या सूचनाही मोबाईल सेवा पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत. जी सिम कार्ड अतिरिक्त ठरविण्यात आली आहेत त्यांचे कनेक्शन 30 दिवसांत रद्द केले जाणार आहे. जे मोबाईलधारक अतिरिक्त कनेक्शनची माहिती देतील त्यांचे कनेक्शन 60 दिवसांत रद्द केले जाणार आहे. मात्र सिम कार्डवरून गैरव्यवहार केले जात असल्याचे सरकारी विभागांनी किंवा वित्तीय संस्थांनी स्पष्ट केले असेल तर सिमकार्ड पाच दिवसाच्या आत रद्द केले जाईल. जी सिम कार्ड ज्या कारणासाठी रद्द केले जातील त्याची माहिती संबंधित मोबाईलधारकांना पुरविण्यात येणार आहे.
आर्थिक गुन्हेगारी आणि अनाहूत कॉलबद्दल बरेच नागरिक वेळोवेळी दूरसंचार विभागाकडे तक्रारी दाखल करीत असतात. लोकप्रतिनिधींनीही या संदर्भात दूरसंचार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र आता खऱ्या अर्थाने यावर परिणामकारक उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.