कोपरगाव, (प्रतिनिधी) : अर्धवट, चुकीच्या ऐतिहासिक माहितीवर विसंबून राहिल्याने तीच माहिती खरी मानल्याने बऱ्याच वेळा समाजामध्ये गोंधळ उडतो. कोणाला आदर्श मानावे आणि कोणाकडून प्रेरणा घ्यावी, याबद्दल तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. यामुळे अनेक वेळा समाजात महापुरुषांबद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊन त्यांच्याबद्दल समाजात कलुषित दृष्टिकोन निर्माण होण्याचा व जातीय- धर्मीय तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो. हे टाळण्यासाठी तरुण पिढीने खरा इतिहास वाचला पाहिजे, तो वस्तुनिष्ठपणे समजावून घेतला पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध कादंबरीकार, पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या मातोश्री सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त चास (नळी) येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मातोश्रींच्या प्रथम स्मृतिदिनी परंपरेने चालत आलेल्या सर्व धार्मिक कर्मकांडांना फाटा देत चांदगुडे कुटुंबीयांनी यावेळी विविध सामाजिक संस्थांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला.
यामध्ये मुकबधीर विद्यालय कोपरगाव, वात्सल्य वृद्धाश्रम, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मायभूमी सोशल फाउंडेशन चास (नळी) यांचा समावेश होता. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थीनींचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक कुप्रथांना तिलांजली देण्यात आली. त्यात कार्यक्रमात महिलांना जाणीवपूर्वक उजव्या बाजूला बसविणे, जेवणाचा मान प्रथम महिलांना देणे, मंचावर केवळ महिलांना बसविणे आदी बाबींतून महिलांचा सन्मान जपण्यात आला. प्रास्ताविक ॲड रंजना गवांदे यांनी केले. आभार सोमनाथ चांदगुडे यांनी केले.