नवी दिल्ली – भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आज दुरदृष्य प्रणालीद्वारे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय सोहळ्यात बोलत होते. कोविड-19 साथीच्या स्वरूपात जगाला आज मानवी जीवनात अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले. या जागतिक साथीविरुद्ध लढा देण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या आघाडीवरील कामगार, डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
भगवान बुद्धांच्या दूरदृष्टीने मानवी दुःख दूर करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याची इच्छा त्यांच्यात जागृत केली. गेल्या वर्षी या संकटाच्या काळात अनेक व्यक्ती आणि संघटना मदतीला धावून आल्या आणि मानवी हालअपेष्टा कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, असे ते म्हणाले.
जगभरातील बौद्ध संघटना आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिले. हे कार्य भगवान बुद्धांच्या भवतु सब्ब मंगलम (आशीर्वाद, करुणा आणि सर्वांचे कल्याण) शिकवणीला अनुरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
गौतम बुद्धांच्या जीवनात शांतता, एकता आणि सह-अस्तित्व या मूल्यांना मोठे स्थान होते, असे पंतप्रधान म्हणाले. परंतु, आजही अशा शक्ती आहेत ज्यांचे अस्तित्व द्वेष, दहशतवाद आणि हिंसा पसरवण्यावर अवलंबून आहे.
ते म्हणाले की अशा शक्ती उदार लोकशाही तत्त्वांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मानवतेवर विश्वास असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन दहशत आणि कट्टरतेला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. भगवान बुद्धांची शिकवण आणि सामाजिक न्यायाला दिलेले महत्त्व जागतिक एकतेची शक्ती बनू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करण्यात आणि बोलण्यात समानता असणारा भारत हा देश असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरितगृह वायूंचे दुष्परिणाम कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर मोदी यांनी यावेळी प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ आणि संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जगभरातील सर्व बौद्ध संघाच्या सर्वोच्च प्रमुखांचा सहभाग घेतला.जगभरातील 50 हून अधिक प्रख्यात बौद्ध धार्मिक नेत्यांनी या संमेलनाला संबोधित केले.
श्रीलंका आणि नेपाळचे पंतप्रधान आणि मंगोलिया आणि भूतानचे सांस्कृतिक मंत्रीदेखील दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. वेसाक-बुद्धपौर्णिमा हा तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान आणि महापरिनिर्वाण दिन असा तिहेरी साजरा केला जातो.