सातारा -जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, कोयना बॅक वॉटर यांसह अनेक प्रेक्षणीय पर्यटनस्थळे आहेत. या माध्यमातून जिल्ह्याचा पर्यटन विकास केल्यास रोजगाराला चालना मिळेल हे लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा स्वतंत्र पर्यटन आराखडा अधिवेशनानंतर बनवण्यात येईल, अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी शासकीय यंत्रणेची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, “”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला.
महाराष्ट्रातील विकास कामांची आव्हाने असून त्याकरिता नीती आयोगाकडे प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांसाठी 18 हजार रुपये कोटींची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामासाठी अत्यंत अनुकूल असून या प्रस्तावांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न असो पुनर्वसनाचा प्रश्न असो पर्यटन वृद्धीतून रोजगार जालना, रखडलेले सिंचन प्रकल्प याकरिता जास्तीत जास्त निधीची मागणी अधिवेशनादरम्यान केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, कोयनानगर हा जो नैसर्गिक अधिवासाने समृद्ध असणारा पट्टा आहे येथे पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना सुविधा तसेच रोजगार निर्मितीसाठी बारकाईने अभ्यास करून स्वतंत्र आराखडा बनवला जाईल. तसे निर्देश जिल्हा प्रशासनाला मी यापूर्वीच दिले असून हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी लवकरच सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 411 कोटीच्या जिल्हा नियोजन समितीच्या विकासकामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यातील कामांची पाहणी करून तातडीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील.
पुढील अडीच वर्षात दुप्पट वेगाने कामे करून जिल्ह्यातील रखडलेले जलसिंचन प्रकल्प मार्गी लावले जातील. डोंगरी भागातील पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या स्थानिक निधी कार्यक्रमातून सोडवले जातील. याकरिता जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील असेही त्यांनी सांगितले. कोयना धरण क्षेत्रातील बोटिंग प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रकल्प मार्गी लावला जाईल, अशी ग्वाहीह त्यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपणास कोणते खाते मिळणार किंवा पालकमंत्री म्हणून आपल्याकडे जिल्ह्याची धुरा येणार का या प्रश्नाचे उत्तर देणे शंभूराज देसाई यांनी खुबीने टाळले.
ते म्हणाले, “हा निर्णय एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणीस यांचा आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.’ मूळ शिवसेना आमचीच असून दादर येथील शिवसेनेची मातोश्री भवन ही इमारत पक्षाच्या नावावर नाही तर ट्रस्टच्या नावावर आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबई येथे प्रति शिवसेना भवन उभारण्याचा आमचा मानस असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अभिप्रेत होती. त्याच विचारांवर आमचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना- भाजप युती चिन्हावर लढणार आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे युतीचे दोनशे आमदार निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणीस यांनी निर्देशित केले आहे, त्या पद्धतीने आमचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांतच खातेवाटप जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डोंगरी भागासाठीही आराखडा
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी आठ तालुके डोंगरी असून तीन तालुके अंशतः डोंगरी आहेत. या भागांच्या स्वतंत्र विकासासाठी व नैसर्गिक आपत्ती टाळण्याकरता स्वतंत्र मनुष्यबळ यंत्रणा आणि करावयाच्या उपाययोजना यांचा एक मार्गदर्शक आराखडा बनवला जाणार आहे. याची जिल्हा प्रशासनाबरोबरच स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चांगलीच गती मिळेल. जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्यालाही मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.