पुणे -अवघ्या काही दिवसांवर दहिहंडी हा उसत्व आला आहे. अनेक गोविंदा पथकांची तयारी सुरू झाली आहे. आगामी कृष्णजन्मोत्सव अर्थात गोकुळाष्टमीला गोविंदा पथकांमध्ये पुरूष आणि स्त्रियांसोबत तृतीयपंथीय देखील दहिहंडी फोडण्यासाठी थर उभारणार आहेत. देशातील पहिले चार गोविंदा पथक स्थापन करण्याचा मान पुणे शहराला मिळाला आहे. स्त्री-पुरूष समानतेसोबत आता तृतीयपंथीयांना देखील कायदेशीर ओळख दिली आहे. त्या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे गोकुळाष्टमी सणाच्या निमित्ताने कुठे पाच थर, तर कुठे सात थरची दहीहंडी पाहण्यास मिळते आणि गोविंदा रे, गोपाला या गाण्यावर ठेका धरत, गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली जाते.ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. आजपर्यंत पुरुष आणि स्त्रियांचे गोविंदा पथक होते. पण आता त्यांच्या बरोबरीला समाजापासून कायम वंचित राहिलेल्या तृतीयपंथी यांचा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 100 जणांचे चार संघ तयार करण्यात आले आहे.
या प्रत्येक संघात 25 जण सहभागी असणार असून 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे. त्यासाठी चार ही संघ सज्ज झाले आहे. तर दीपस्तंभचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दीपक मानकर म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे.त्या प्रमाणे तृतीयपंथी यांना देखील आहे.आज तृतीयपंथी विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहे.ही चांगली बाब असून समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे स्विकारले पाहिजे.त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा प्रथमच तृतीयपंथी यांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.जवळपास 100 तृतीयपंथी एकत्रित आले असून आता हे सर्व 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहे.यामधून समाजाला एक संदेश जाण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे म्हणाल्या की, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे.त्यापैकी एक तृतीयपंथी यांचा गोविंद पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या करीता सर्वांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे.100 तृतीयपंथी असून प्रत्येकी संघात 25 जणांचा सहभाग असणार आहे.हे चार संघ 7 सप्टेंबर रोजी नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यास सुरुवात करणार असून दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून देखील दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तृतीयपंथी कादंबरी म्हणाल्या की, “आजपर्यंत आम्हा तृतीयपंथी यांना वेगळ्या नजरेने पाहिले जात होते.पण मागील काही महिन्यात आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे.हे पाहून आनंदाची गोष्ट वाटते. तसेच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीयपंथी यांना सुरक्षा रक्षक होण्याचा मान दिला.त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानते आणि आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यास यातून मदत झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक सण उत्सवांमध्ये आम्ही सहभागी होत नव्हतो. पण आता गोविंदा पथकात सहभागी होण्यास मिळत आहे.हे पाहून खूप छान वाटते आणि असे उपक्रम राबविण्याची गरज आहे.”