मुंबई – राज्यात आजसह पुढील दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यामुळे थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर मात्र, ख्रिसमस सणाच्या दरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील आठवड्यात मात्र राज्यातील तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
राज्यात तीन दिवस आकाश अंशत: आभ्राच्छादित राहू शकते. कारण उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर तयार होत आहे. दरम्यान येत्या ७२ तासांत किमान तापमानात काही अंशी घट होईल. मात्र, २१ व २२ डिसेंबरला पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावाने तापमानात किंचित वाढ होऊ शकते.
राज्यात सध्या तरी थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणारे थंड वारे मध्य प्रदेशवरून जाऊन उत्तर-पूर्वेला होऊन महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. यामुळे दोन दिवस किमान तापमानात घट होईल. पारा ११ अंशांवर येऊ शकतो.
गारठा मात्र कायम
गोंदिया आणि यवतमाळ येथे किमान तापमान ९ अंश, नागपूर येथे ९.४, तर वाशीम येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वरच आहे. आज विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.