वाघोली (पुणे) – राज्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात होत आहे. गावातील सामाजिक ऐक्य वाढीस लागण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होणे काळाची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ आबा काकडे यांनी केले आहे.
वर्षभरामध्ये अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे नागरिक ग्रामपंचायत निवडणुकांना मतदानाचा हक्क बजावतात. मात्र हा हक्क बजावताना समोर उभा असणारा उमेद्वार आपल्या गटाचा, भावकीचा, मित्रत्वाच्या संबंधाचा, लोकाभिमुख असे अनेक तर्कवितर्क लावत नागरिक मतदान करत असतात. विकासामध्ये हातभार लावण्याची संधी प्रत्येकाला हवी असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आत्मा असणारी ग्रामपंचायत निवडणूक जेव्हा होते.
सुरुवातीला निवडणुकांमुळे अनेक गट उभे राहतात. गटाचे प्रतिनिधीत्व आणि गटातील जास्तीत जास्त उमेद्वारांना सदस्य म्हणून पाहण्याची संधी विकासाच्या मुद्द्याला बाजूला सारत सत्तेचा उपभोग घेण्याच्याजवळ जाते. त्यामुळे अशा निवडणुका प्रतिष्ठेच्या बनतात. लोकाभिमुख, लोकांसाठी व लोक निर्णयासाठी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राहणारे सनदी अधिकारी या सर्वांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा त्या गावाला होत असतो. सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याची व सामाजिक तेढ दूर करण्याची एकमेव संधी ग्रामपंचायत निवडणुकांमधून मिळते. म्हणून या ग्रामपंचायत निवडणुका आपापल्या स्तरावर नागरिकांनी तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन बिनविरोध कराव्यात, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.