जामखेड – श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या वेळी पहिले रिंगण जमादारवाडी येथील संत वामनभाऊ महाराज गड येथे उत्साहात झाले. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखालील या पालखीचे शहरात आगमन होताच भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांना फळे, चहा बिस्कीट, औषध, पाणी व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचे आगमन झाले. तेथे मानाचा अभंग होऊन रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… हा जयजयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्याची पारणे फेडली. वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला.
या वेळी दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत, ऋषिकेश महाराज माने व संत वामनभाऊ महाराज वारकरी संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वांत मोठी दिंडी आहे. या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून सुमारे 25 हजारांहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत.