सातारा -संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने कराड-पाटण रस्त्याच्या कामावरून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अन्य अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाहीत, कल्पना देत नाहीत, हे योग्य नसल्याचे सांगत सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील पारधी कुटुंबे उघड्यावर असून, त्यांना विविध योजनांमधून घरकुले देण्याची मागणी सदस्यांनी केली.
जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. आ. दीपक चव्हाण, शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, विश्वास भोसले, शुभांगी ढेरे, मारूती मोळावडे, जयश्री जाधव, सुरेश काळे, प्रवीण आगवणे, बाळकृष्ण ननावरे, विजय जगदाळे, अरुण माने, सतेश कांबळे, कुसुम जाधव व अधिकारी उपस्थित होते.
कराड-पाटण रस्त्याचा विषय चर्चेला आला, असता संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याचे लक्षात आले. त्यांनी अन्य अधिकाऱ्यांना बैठकीला पाठवले होते. मागील बैठकीतही असेच घडले होते. संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वेळ नसल्याचा मुद्दा सदस्यांनी दुसऱ्यांदा उपस्थित केल्याचे शेखर सिंह म्हणाले. कराड-पाटण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे सर्वेक्षण प्रांताधिकारी, तहसीलदार, आरटीओ यांनी करून त्याचा अहवाल एका आठवड्यात द्यावा. गटविकास अधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. जास्तीत जास्त कामे सुरू करण्याच्या सूचनाही सिंह यांनी दिल्या.
सातारा-फलटण मार्गावर वाढे व वडूथ येथे पुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तेथे पाणी साचते. महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी किरण साबळे-पाटील यांनी केली. वाढे चौकातील खड्ड्याभोवती गेल्या काही वर्षांपासून बॅरिकेडस् असून, त्वरित डागडूजी करून बॅरिकेडस् हटवण्याची मागणी ऍड. विनित पाटील यांनी केली.
गावोगावी महिला बचत गट असून, महिलांनी उत्पादित केलेला माल विकण्यासाठी शासकीय जागांवर स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ऍड. विनित पाटील व समिंद्रा जाधव यांनी केली. रत्नागिरीतून रसायनांचे टॅंकर कराड तालुक्यातील गावांमध्ये येत असून, ती रसायने शेतकरी शेतात ओतत आहेत. कालांतराने ही विषारी रसायने विहिरींमधील पाण्यात मिसळून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी संगीता साळुंखे यांनी केली. त्यावर, प्रातांधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, अशी सूचना सिंह यांनी केली.