नवी दिल्ली, – येत्या डिसेंबर अखेरपर्यंत यमुनेमध्ये कोणतेही घाणेरडे पाणी वाहून येणार नाही याची व्यवस्था केली जाईल त्यामुळे यमुनेच्या प्रदुषणाचे मुख्य कारण नाहीसे होईल आणि यमुनेच्या शुद्धीकरणासाठीचा महत्वाचा टप्पा गाठला जाईल असे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाचे महासंचालक जी अशोककुमार यांनी सांगितले.
ते म्हणाले की यमुनेत जिथून घाण पाणी येते ते सर्व स्त्रोत डिसेंबर पर्यंत बंद केले जात आहेत. 1,300 किमी पेक्षा जास्त लांबीची यमुना ही देशातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे आणि राष्ट्रीय राजधानीच्या अर्ध्याहून अधिक भागाला याच नदीतून पाणी पुरवठा होतो.
अशोकुमार म्हणाले की, 18 ठिकाणच्य प्रमुख स्त्रोतातून यमुनेत दूषित पाणी मिळत असते. या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. थेट यमुनेत मिसळणारे पाणी, सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे. यमुनेच्या काठावर आता सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे सुरू झाली आहेत, त्यामुळे डिसेंबरपर्यंत यमुना नदीत कोणतेही घाणेरडे पाणी येणार नाही आणि तिच्या प्रवाहातही सुधारणा दिसून येईल, असे त्यांनी पीटीआयला सांगितले. अशोककुमार म्हणाले की यमुनेत येणारे दूषित पाणी थांबवल्यानंतर मुख्य नदीच्या स्वच्छतेचे काम सुकर होईल आणि नदीचा प्रवाह सुनियोजित पद्धतीने सेट केला जाईल.
यमुनेचा फक्त 2 टक्के म्हणजेच 22 किमीचा भाग दिल्लीत येतो, परंतु यमुनामधील 98 टक्के प्रदूषण हे या 22 किमीच्या भागातूनच होते असेही त्यांनी नमूद केले. दिल्ली शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट यमुनेत सोडले जाते व औद्योगिक टाकाऊ पदार्थही याच नदीच्या पात्रात टाकले जातात. त्यांना पायबंद घालणे महत्वाचे होंते ते काम आता होत आहे असे ते म्हणाले.