– अक्षय भुजबळ
भारताने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याला आज 25 जून रोजी 40 वर्षे पूर्ण होत आहे. म्हणूनच त्या दिवशीच्या अनेक आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
भारताने 25 जून 1983 रोजी इतिहास रचला. ही आजही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 2011 चा वर्ल्डकप याची देही याची डोळा पाहणाऱ्या 90 च्या दशकात जन्मलेल्यांना 83 च्या वर्ल्डकपबाबत आजही कुतूहल वाटतं. ब्लॅक अँड व्हाइटमधून नुकताच कलरफुल होत चाललेला तो काळ जाणून घेताना वेगळीच मजा येते. दूरदर्शन कलरफुल झालेले असले तरी आम आदमी अजूनही रेडिओचा आवाज ऐकायला गर्दी करत होता.
क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होऊन दहा वर्षे उलटून गेली होती. विशेष म्हणजे पहिल्या दोन्ही वेळेस वर्ल्ड कप जिंकण्याचा मान वेस्ट इंडीज संघाने पटकावला होता. 83 चा वर्ल्डकप विंडीजचा संघ जिंकेल आणि विजयाची हॅट्ट्रिक करेल असे बहुतांशी लोकांना त्यावेळी वाटत होतं. मात्र, भारतीय टीममुळे विंडीजने हॅट्ट्रिकची संधी गमावली. त्यावेळी कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की भारत वर्ल्ड कप जिंकेल. वर्ल्डकपच्या सुरुवातीला भारताने विंडीतसोबत झिम्बाब्वेला नमवत सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आणि मजल दरमजल करत फायनल गाठली. 25 जून रोजी लॉर्डसच्या मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमधील त्या फायनलनं भारताला वर्ल्डकप सोबतच आणखी बरंच काही दिलं.
कपिल देव आणि क्लाइव्ह लॉईड टॉस करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा मैदानातील बहुतांशी प्रेक्षक वर्ग हा विदेशी होता, फार कमी भारतीय समर्थक त्यावेळी मैदानावर उपस्थित होते. विंडीजने टॉस जिंकला आणि भारताला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. असे म्हणतात की विंडीजच्या खेळाडूंनी त्या दिवशी लवकर मॅच संपवून विजय साजरा करण्याची तयारी देखील केली होती.
भारताची सुरुवात गडगडली
सुनील गावसकर आणि के. श्रीकांत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. मात्र, अँडी रॉबर्टसने गावसकर यांना अवघ्या दोन धावांवर बाद करत भारताला जोरदार धक्का दिला. त्यानंतर मैदानात आलेला मोहिंदर अमरनाथने श्रीकांतसोबत चांगली फटकेबाजी केली. दोघांनी 50 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. भारताचे फलंदाज फॉर्ममध्ये आले असे वाटत असताना माल्कम मार्शलनं टाकलेला बॉल श्रीकांतच्या पॅडवर लागला आणि भारताला 59 धावांवर दुसरा झटका बसला. एखाद्या मशीनप्रमाणे विंडीज बॉलर्स त्या दिवशी बॉलिंग करत होते. रॉबर्ट झाला की मार्शल आणि मार्शलनं ब्रेक घेतला की मायकल होल्डिंग मैदान दणाणून सोडत होता.
भारतीय टीमनं सेंच्युरी पूर्ण करेपर्यंत यशपाल शर्मा (11) आणि कपिल देव (15) तंबूत परतले होते. जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर विंडीजनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपलं पूर्णपणे वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. भारताचा स्कोअर 111 रन्स वर सहा विकेट्स असताना मैदानातील प्रेक्षकांनी देखील विंडीज वर्ल्ड कपची हॅट्ट्रिक करणार असे गृहीत धरले होते. त्यानंतर एकही फलंदाज मैदानात जास्त वेळ थांबू शकला नाही. सईद किरमाणीला होल्डिंगनं बाद केलं आणि भारताचा डाव 54.4 षटकांमध्येच गुंडाळला गेला. श्रीकांतने केलेल्या सर्वाधिक 38 धावा आणि संदीप पाटीलच्या 27 धावांच्या जोरावर भारताने 183 धावांपर्यंत मजल मारली.
विंडीजच्या विजयाला सुरूंग
भारताला 183 धावांवर ऑल आउट केल्यानंतर विंडीजच्या टीमनं तंबूमध्ये विजयाची तयारी करायला सुरुवात केली. गॉर्डन ग्रीनिज आणि डेस्मंड हेन्स यांनी विंडीजच्या डावाची सुरुवात केली. बॉलर्सप्रमाणे तगडी बॅटिंग लाइन असलेल्या विंडीजचे ओपनर्सच ही मॅच जिंकतील असं अनेकांना वाटत होतं. मात्र मोहिंदर अमरनाथनं टाकलेला बॉल सोडून देण्यासाठी ग्रीनिजनं आपले हात वर केले आणि बॉलनं आतमध्ये घुसत थेट बेल्स उडवल्या.
अवघ्या पाच धावांवर विंडीजला पहिला धक्का बसला त्यानंतर मैदानात एन्ट्री झाली ती सर रिचर्डस यांची. मदनलालला लागोपाठ तीन चौकार मारत रिचर्डस यांनी प्रेक्षकांच्या चांगल्या टाळ्या मिळवल्या आणि मॅच पूर्णपणे विंडीजच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. बोर्डावर 50 धावा असताना विंडीजला हेन्सच्या रूपाने दुसरा झटका बसला. अजूनही विंडीजला विजयासाठी 134 धावांची आवश्यकता होती.
मदनलालने टाकलेल्या बॉलवर रिचर्डस यांनी जोरदार फटका मारला; सर्कलच्या आतमध्ये उभा असलेल्या कपिल देवने वीस मीटर मागे पळत जाऊन अफलातून कॅच घेतला आणि विंडीजच्या विजयालाच सुरूंग लावला. 57 धावांवर तिसरी विकेट गेल्यानंतर भारतीय टीममध्ये खऱ्या अर्थाने जल्लोषाचे वातावरण सुरू व्हायला सुरुवात झाली.
विंडीजची दाणादाण
रिचर्डस बाद झाल्यानंतर लॉर्डसवरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. त्यानंतर कॅप्टन लॉईड (8), लॅरी गोम्स (5) आणि फाउंड बछूस (8) हे फलंदाज तर मैदानावर केवळ हजेरी लावण्यासाठी आले आणि लगेच तंबूत परतले. मदनलाल, बलविंदर सिंधू आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या अप्रतिम बॉलिंग समोर विंडीजची अक्षरशः दाणादाण उडायला सुरुवात झाली. 119 रन्स वर सात विकेट्स गेलेल्या असताना अमरनाथ यांनी जेफ दुजॉं (25) आणि माल्कम मार्शलला (18) बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीने वर्ल्डकपच्या फायनल मॅचचा रंग बदलून टाकला होता.
आता भारत विजयापासून थोड्याच अंतरावर होता. अमरनाथ यांनी टाकलेल्या बॉलवर होल्डिंग पायचित झाला आणि भारतीय खेळाडूंनी पॅव्हेलियनच्या दिशेने धाव घेतली. कॅप्टन कपिल देवसह इतर खेळाडू बाल्कनीत येऊन विजयाचा आनंद व्यक्त करत होते, तर मैदानावर प्रेक्षकांचा जल्लोष सुरू होता. 140 धावांवर विंडीजला ऑल आउट करत भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर आपलं नाव कोरत “न भूतो न भविष्यती’ असा विजय संपादन केला.
वर्ल्डकप जिंकणारे खेळाडू सामान्य भारतीयांचे असामान्य हिरो झाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान अभिमानानं उंचावली गेली. लढाई युद्धाच्या मैदानातील असो किंवा खेळाच्या मैदानातील भारत जिंकण्यासाठी सक्षम आहे, असा संदेश इतर देशांना मिळाला.