आळंदी – विद्यार्थ्यांनी जीवन जगताना नकारात्मक जीवन न जगता सकारात्मक जीवनाकडे मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनिअर कॉलेज, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, राजा शिवछत्रपती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुरुषोत्तम महाराज म्हणाले, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत आळंदीमध्ये विविध शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. या शाखांच्या माध्यमातून ‘महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण ‘ या उक्तीप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गरुड झेप घेत आहेत.
शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात म्हणाले, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची 9 ऑगस्ट 1989 साली क्रांती दिनाचे औचित्य साधून तसेच फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासून स्थापना झाली होती. यावेळी थोरात यांनी रयत शिक्षण संस्थेचा उद्देश आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या उद्देशामध्ये विचारप्रणालीच्याबाबत कसे साम्य आहे यासंदर्भातही विविध उदाहरणांचे दाखले दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. स्मिता वाघमारे यांनी करून दिला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने प्रशासकीय संचालक राजीव पाटील, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे आणि आदित्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शितल पाटील यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीव कांबळे व प्रा. स्मिता वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल पानसरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शाखेतील विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.