राहुरी – उंबरे येथील घडलेली घटना ही अतिशय निंदास्पद आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून त्याची पाळेमुळे शोधून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. प्राजक्त तनपुरे यांनी केली. कोणत्याही प्रकारे विनाकारण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा कुठल्याही घटनेत सर्वसामान्यांना त्रास झाला, तर अधिवेशनात त्या बाबत आवाज उठवू, असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
उंबरे येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) झालेल्या शांतता बैठक घेण्यात आली. या वेळी आ. तनपुरे यांनी नागरिकांशी संवाद साधून पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, आदिनाथ महाराज दुशिंग, सरपंच सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, सुनील आडसुरे, राजेंद्र बानकर, नवनाथ ढोकणे, मच्छिंद्र सोनवणे, गोरक्षनाथ दुशिंग, बाळासाहेब उंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, येथील कुठल्याही हिंदू बांधवांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी. या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का नाही असादेखील प्रश्न तनपुरेंनी उपस्थित केला. अनेक पालकांनी आपल्या मुली शाळेतून काढून घेतल्या हे दुर्दैव आहे आणि ते पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे अशी वेळ भविष्यात येऊ नये; अन्यथा आम्ही लक्ष घालू, असा इशारा आ. तनपुरे यांनी या वेळी दिला.