मुंबई – गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या चर्चेनंतर एसटी पूर्वपदावर आणा सर्व मागण्या मान्य होतील, प्रवाशांना वेठीस धरून नका, अशी विनंती शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली. तर कामावर रुजू झाल्यास कारवाईवर फेरविचार करण्यात येईल. जनतेला, एसटीला वेठीस धरून कोणताही फायदा होणार नाही, असे अनिल परब यांनी सांगितले. याबैठकीला एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.
बैठकीनंतर एसटी कृती समितीचे सदस्य अजय गुजर म्हणाले, आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदलत आहोत, अॅड गुणरत्न सदावर्ते यांची वकीली मागे घतली असून त्यांच्याजागी आता अॅड सतीश पेंडसे हे आमच्याकडून लढतील अशी माहिती गुजर यांनी दिली.
यानंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शरद पवार, अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. सदावर्ते म्हणाले, आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केले होते की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणले. शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावेसे वाटले नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असा इशारा अॅड. सदावर्ते यांनी पवार आणि परबांना दिला आहे.