शर्मिला जगताप
14 नोव्हेंबर म्हटले की आठवते पं. नेहरू यांच्या कोटावरील गुलाबाचे फूल आणि फूल म्हटलं की आठवते मूल. चाचा नेहरूंना फुले आणि मुले आवडायचे म्हणून ते फूल कोटाला लावत असत. मुलं ही फुलाप्रमाणेच असतात नाजूकशी, निरागस. त्यांचा उचित सन्मान व्हावा म्हणून चाचा नेहरूंची जयंती बालदिन म्हणून आज साजरी होत आहे.
आजच्या दिवशी फुलातील रंग मुलांमध्ये उतरवूया. फूल पाहून मनाला आनंद वाटत नाही, असा शोधूनही सापडणार नाही. त्याचप्रकारे गोंडस मुलं आवडत नाही, असाही एखादा शोधावाच लागणार. सकाळच्या कोवळ्या उन्हात विविध फुलझाडांची फुलं वेचताना आपण फुलांची किती काळजी घेतो. नीट खुडून घेऊन अलगत टोपलीत टाकतो. तोच हळूवारपणा मुलांचं संगोपन करताना जपला पाहिजे.
मुलं ही देवाघरची फुलं, असे कायम ऐकू येणारं वाक्य. पण मुलांमध्ये मुलगा-मुलगी हा भेद कुणी केला. मुलीचा भ्रूण असेल तर आपल्या पोटातून का दूर सारला जातो. मुलींना जन्माचा अधिकार कुणी नाकारला? अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधूया.
बालदिन मुलं-मुली दोघांसाठी सारखाच. बागेत बागडणारी फुलपाखरे आणि मुलं सारखीच. त्यांच्यातील बालपण हिरावून घेऊ नका. लहान मुलांचं विश्व टिकू द्या. त्यांच्यावर विनाकारण बोजा टाकून त्यांचे बालपण आपण का हिरावून घ्यायचं.
लहान मुलांना कामाधंद्यात टाकू नका. मुलामुलींचा अनैतिक व्यापार हा थांबावा. भिकारी मुले-मुली शाळेत जातात का? त्यांचे बालपण रस्त्यावरच का? सिग्नलला भीक मागताना त्यांच्या मागणाऱ्या हातापेक्षा त्यांच्या डोळ्यातील भाव आपल्याला का शोधता येत नाहीत? या मुलांनाही बालदिन साजरा करता यावा, असे वाटते आपल्याला वाटतं का?
या सर्व फुला-मुलांना एकाच टोपलीत अलगद ठेवता येणार नाही का, असो. आजच्या बालदिनी आपल्या मुलाबाळांना, शेजारील, ओळखीच्या मुलांना बालदिनाचे महत्त्व सांगून बालदिन साजरा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूया. मुलांच्या भाव-भावना जपताना आपण आजच्या दिवशी लहान होऊन बालपण जगूया!