– अरुण गोखले
अशाच एका सत्संगाचे वेळी एका भाविक भक्ताने महाराजांना असा प्रश्न विचारला, की महाराज तुम्ही आम्हाला दर वर्षी देवीच्या नवरात्राची उपासना ही आश्विन प्रतिपदा ते पौर्णिमा अशी पंधरा दिवसांची करायला लावता, ते का? या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणाले की बाबांनो, ही उपासना पंधरा दिवसांची असून त्यातले काही दिवस, तिथी या महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, प्रतिपदा हा तर त्या देवीच्या घरोघरी साजऱ्या होणाऱ्या घटस्थापनेचा पहिला दिवस. ललिता पंचमी या दिवशी ती देवी परणीत पेरलेल्या धानातून तुमच्या देवघरात व्यक्त स्वरूपास आलेली असते.
अष्टमी हा या उपासनेचा मध्य दिवस. अष्टमी ही तिथी फार महत्त्वाची आहे. दशमीला उपासकाने जीवदशेकडून देवत्वाच्या दिशेने सीमाल्लंघन करायचे असते. तर एकादशी हा तिची अंतर्मुख उपासना करण्याचा दिवस. अष्टमी हा या उपासनेतला महत्त्वाचा दिवस. संख्या शास्त्रानुसार आपण जर 1 ते 10 या संख्येचे लेखन करीत गेलो. तर त्यात आठ ही एकच संख्या अशी आहे की ती गाठरहित आहे आणि म्हणूनच सिद्ध साधक उपासक यांच्या म्हणण्याप्रमाणे या अष्टमी तिथीला महत्त्व आहे.
कारण जे भक्तभाविक देवीची उपासना करतात त्यांच्या जीवनातील माया, मोह, स्वार्थ, लोभ याच्या गाठीही देवी एकेक करून सोडवत असते. मानवी मनात अशा अनेक दुष्ट विचारांच्या, कर्मांच्या, वासनांच्या आत्मघातकी गाठी पडलेल्या असतात. जीव हा त्यात अडकलेला असतो. बांधला गेलेला असतो. त्याला त्यातून या दिवशी देवी मोकळा करत असते. त्याचे अज्ञान दूर करून त्यास बंधनमुक्त गाठीमुक्त करणे हे कार्य या दिवशी घडत असते. आपली सन्मुखता, आर्तता, कळकळ ही या गाठी सोडवून घेण्यासाठी असायला हवी.