– अरुणा सरनाईक
वर्षा ऋतूत अंगावर हिरवी वस्त्र लेवून पानाफुलांतून तृप्ततेचा हुंकार वृक्ष टाकीत असतानाच एका पहाटे आश्विनाची चाहूल लागते. संपूर्ण वातावरणाला नवचैतन्याचा झळझळता स्पर्श असतो. आश्विन महिना तृप्तीचा असतो.
भाद्रपद संपता संपता दिवस पालटायला लागतात. पावसाची संततधार संपून जाते. आकाश निरभ्र होऊ लागते. हवेतला नाहीसा झालेला उष्मा पुन्हा जाणवू लागतो. तरीपण सकाळ आल्हादकारक असते. पितृपंधरवडा सुरू होतो. गौरीगणेशाच्या सुखद धावपळीनं शिणलेल्या देहमनाला हा रिक्त पंधरवडा आराम देतो. पितरांचे स्मरण तर्पण करता करता एखाद्या पहाटे जाणवून जातं, “अरे आले नवरात्रीचे दिवस!’ तसं नवरात्र वर्षातून तीन वेळा असतं पण आश्विनातील नवरात्र काही वेगळ्या रूपात देखणं असतं. नवरात्रीचे दिवस मोठे छान असतात. छान असणं ही मनाची अवस्था या सर्व गोष्टींमुळे होत असते. एक वेगळेच रूप या आश्विन महिन्यात दिसते.
एखाद्या सुंदर तरुणीनं मनाच्या अत्यंत तरल अवस्थेत एखादेच पातळसर शुभ्र वस्त्र लपेटून नदीत स्नानाला उतरावं. अलंकाररहीत तिच्या त्या अनाघ्रात सौंदर्याला एक नैसर्गिक सहजतेचा स्पर्श असतो. तसाच काहीसा स्पर्श या आश्विनाला असतो. वर्षा ऋतूत अंगावर हिरवी वस्त्रं लेवून पानाफुलांतून तृप्ततेचा हुंकार वृक्ष टाकीत असतानाच एका पहाटे आश्विनाची चाहुल लागते. आश्विनाचं वातावरण आणि आदिशक्तीचं नव दिवसाचं आगमन. सपूंर्ण वातावरणाला नवचैतन्याचा झळझळता स्पर्श असतो.
एवढ्यात ऋतू बदलायला सुरुवात झाली. दुपारचे उष्ण वारे आणि सकाळचे थंड वारे. हेच कोवळे वारे पुढे पक्व होतात आणि मग थंडीला सुरुवात होते. निसर्गाइतका वक्तशीरपणा आणि काटेकोरपणा कुठेच आढळत नाही. आताचा कोवळा थंड वारा थंडीची जणू सवय लावतो. पुढे येणारी थंडी सोसायला बळ देतो. आश्विन महिना तसा तृप्तीचा असतो, जे हवं ते मिळण्याचा, आनंदोत्सव साजरा करणारा आणि करविणारा असा असतो. आल्हाददायक वातावरण. घर, शेती, धान्यानं भरून गेलेली असतात.
सृष्टीदेखील हुंकार भरू लागलेली असते. अशा वेळी येते ती आदिशक्तीची नवरात्र! नव दिवसांचे सुखद आगमन! सकाळच्या कोवळ्या केशरी उन्हांसोबत वातावरण भारून टाकतो. सहजचं म्हटलं जातं आश्विनातील नवरात्रीचे दिवस मोठे छान असतात. छान असणं ही मनाची अवस्था या सर्व गोष्टींमुळे असते. एक वेगळेच रूप आश्विन महिन्यात दिसते. वर्षा ऋतूत बहरलेली झाडं आता हळूहळू आपल्या शरीरावरील पर्णसंभार उतरवू लागतात. हिरव्या नटलेल्या झाडांच्या सौंदर्यासोबत हेही पर्णहीन काहीसे निराळे सौंदर्य मनाला मोह घालते. आकाशदेखील आता मोकळं झालेलं. पाण्याच्या ढगांचे जडत्व संपून हलके झालेले विरळ शुभ्र ढगांचे पुंजके आकाशभर विहरताना दिसू लागतात आणि पाण्याच्या ढगांचे जडत्व संपल्याचे जाणवून जाते.
निसर्गाचा हा गुण खरोखर आपण आत्मसात करण्यासारखा आहे. जे आहे वास्तव ते आनंदाने स्वीकारावं. जे जातंय ते आपलं पूर्णत्व पूर्णपणे जगून जातंय अशा वेळी त्याला आनंदान निरोप देऊन जाऊ द्यावं आणि जाण्याचं दु:ख स्वत:ही नाही करावं आणि जाणाऱ्यानंही आनंदानं जावं. नवीन येणाऱ्याचंही स्वागत तेवढंच अगत्यशीलतेनं करावं. म्हणूनचं निसर्ग नित्यनूतन असतो. अनंतकाळाचा साक्षीदार असतो. साक्षीभावानं जो सगळं बघतो, सोसतो तो निसर्ग. हे तो आपल्याला अबोलपणानं ऋतूंच्या माध्यमातून शिकवत असतो. हा अबोल शिक्षक सतत आपल्या सोबत असतो.
कुठूनसा उत्साहाचा वाहणारा स्रोत साऱ्या जीवसृष्टीला प्रसन्न करतो. याच अशा प्रसन्न, आनंददायी वातावरणात घरं धान्यांनी भरलेली असतात आणि आदिशक्तीचं आगमन होते. मोठ्या उत्साहानं तिचं स्वागत केलं जातं. मनानं तृप्त समाधानी गृहस्वामिनी परिपूर्ण मनानं मोकळ्या आवाजात देवीचा जोगवा मागते. सारं काही मनासारखं होवो असं दान मागते. गरब्याच्या गाण्यानं आणि त्यातील दांडियावर थिरकणाऱ्या नव तारुण्यानं केवळ ती जागाच नाही तर आकाशसुद्धा नवरंगानं नटून जातं आणि मग आपल्याही नकळत आपण म्हणतो आश्विनाचं आकाश मोठं विलोभनीय असतं. विविध रंगाची उधळण करीत ते आपल्याला आपल्यात सामावून घेतं. गरब्यानं नवीन पिढीला मंगलतेचा, धार्मिकतेचा स्पर्श होतो. तरुणी या दिवसांत नखशिखांत नटलेल्या दिसतात हेही सुख आपल्याला आश्विनचं देतो!
किती नाना परीनं तो आपल्याला देत असतो, शिकवित असतो. वेळेचं महत्त्व, येण्या-जाणाऱ्याचे स्वागत करावं आणि हो, जाणाऱ्याला पुन्हा यावंसं वाटेल असा निरोप द्यावा. किती काळ, किती युगं लोटलीत याची नोंद नाही, तरी ऋतूंचे येणे जाणे असे चक्र सुरू आहे. प्रत्येक ऋतूंची आपली एक शान आहे. एक दिमाख आहे. एक डौल आहे. एक वेगळेपण आहे. हे वेगळेपणातूनच ते आपल्याला असं ओळखू येतात. प्रिय होतात. या ऋतूंची स्वत:ची अशी एक मनोवृत्ती आहे. त्याचबरोबर हे सारं देण्याची-वाटण्याची दानत आहे. आश्विनाची मनोवृत्तीच मुळी नव्याचं स्वागत करण्याची आणि जुन्याला निरोप देण्याची अशी तरुण आहे. म्हणतात ना आश्विन महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तीदेखील अशाच उत्सवप्रिय, नव्याचं स्वागत करणाऱ्या, सदातरुण असतात. त्या आयुष्याचा उत्सव नाही तर महोत्सव करतात.