– माधव विद्वांस
भारतीय चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळात 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे तत्कालीन तरुणाईचे लाडके अभिनेते शम्मी कपूर यांचा आज जन्मदिन. पेशावर येथून स्थलांतरित पृथ्वीराज कपूर यांचे ते पुत्र. त्यांचा जन्म मुंबई येथे 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. मात्र, त्यांचे बालपण कलकत्ता (कोलकाता) येथेच पार पडले. कलकत्ता येथेच त्यांचे मॉंटेसरी शिक्षण झाले.
मुंबईत परत आल्यानंतर ते प्रथम सेंट जोसेफ कॉन्व्हेंट (वडाळा) आणि नंतर डॉन बॉस्को शाळेत गेले. ह्युजेस रोड येथील न्यू एरा स्कूलमधून त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रामनारायण रुईया कॉलेजमध्ये अल्पकाळ महाविद्यालयीन शिक्षण घेतले व शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये वर्ष 1948 मध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून 50 रुपये पगारावर चंदेरीदुनियेत प्रवेश केला. ते चार वर्षे पृथ्वी थिएटर्समध्ये राहिले. नंतर वर्ष 1953 मध्ये महेश कौल यांनी दिग्दर्शित केलेल्या “जीवन ज्योती’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. वर्ष 1956 मध्ये “मेम साहिब’ या चित्रपटात, त्यानंतर वर्ष 1957 मध्ये नासिर हुसेन दिग्दर्शित “तुमसा नहीं देखा’ या चित्रपटांना मात्र चांगले यश मिळाले.
हलक्या-फुलक्या आणि स्टायलिश प्लेबॉयची प्रतिमा त्यांनी प्राप्त केली. वर्ष 1961 मध्ये “जंगली’ प्रचंड यशस्वी झाला.1960च्या दशकात आशा पारेख, सायराबानू, शर्मिला टागोर आणि साधना यांसारख्या नवीन अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी जमली होती. त्यावेळी जंगली, राजकुमार, प्रोफेसर, दिल तेरा दिवाना, चायना टाउन, काश्मीर की कली, ब्लफ मास्टर आणि तिसरी मंझिल यांसारखे चित्रपट यशस्वी झाले. वर्ष 1968 मधे “ब्रह्मचारी’साठी त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. वर्ष 1950 ते 1970 दरम्यान हिंदी चित्रपटांमध्ये एकमेव नृत्य करणारे नायक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले. ते त्यांच्या गाण्याचे पदन्यास स्वतःच करायचे. त्यांना कोरिओग्राफरची गरज भासली नाही. यामुळे त्यांना भारताचे “एल्विस प्रेस्ली’ हे नाव मिळाले.
वर्ष 1955 मध्ये त्यांची अभिनेत्री गीता बालीशी भेट झाली. “रंगीन रातें’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते प्रेमात पडले. चार महिन्यांनंतर या जोडप्याने मुंबईच्या मलबार हिलजवळील बाणगंगा मंदिरात लग्न केले. त्यांना दोन अपत्ये झाली. बाली यांचे 21 जानेवारी 1965 रोजी वयाच्या 35व्या वर्षी स्मॉलपॉक्स आजारामुळे निधन झाले. एका मुलाखतीत मुमताजने सांगितले होते की, “ब्रह्मचारी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जवळ आले होते, म्हणून शम्मी कपूर यांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मुमताज सांगते की, तिने नम्रपणे नकार दिला होता, कारण शम्मी कपूर यांची इच्छा होती की तिने तिची कारकीर्द सोडून द्यावी. त्यानंतर, शम्मी कपूर यांनी 27 जानेवारी 1969 रोजी गुजरातमधील भोजपारा येथील नीला देवीशी विवाह केला. फिल्मफेअरने त्यांना बॉलीवूडच्या सर्वात स्टायलिश पुरुष यादीत प्रथम स्थान दिले. 14 ऑगस्ट 2011 रोजी त्यांचे निधन झाले.