पणजी – गोव्यात तृणमुल कॉंग्रेसने कॉंग्रेस पक्षाशी आघाडी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता, पण त्यांनी आमच्याच पक्षाच्या नेत्यांना फोडण्याचा प्रकार केल्याने आम्ही त्यांच्याशी आघाडीचा प्रस्ताव अमान्य केला आहे अशी माहिती कॉंग्रेसचे गोव्यातील निरीक्षक पी चिदंबरम यांनी दिली.
गोव्यात कॉंग्रेसने आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर चवताळलेल्या तृणमुल नेत्यांनी थेट चिदंबरम यांच्यावरच तोंडसुख घेतले होते. गोव्यातील भाजप सरकारला सत्तेवरून घालवण्यात कॉंग्रेसला अपयश आले तर त्याची जबाबदारी थेट चिदंबरम यांच्यावरच सोपवावी आणि चिदंबरम यांनी राजकीय संन्यास घ्यावा अशी प्रतिक्रीया तृणमुलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दिली होती.
त्यावर प्रतिक्रीया देताना चिदंबरम यांनी वरील माहिती दिली. तृणमुल कॉंग्रेसचे नेते 14 फेब्रुवारी रोजी माझ्याकडे आघाडी करण्याचा अधिकृत प्रस्ताव घेऊन आले होते असा गौप्यस्फोटही चिदंबरम यांनी केला आहे. कॉंग्रेसचे नेते फोडूनही त्यांना कॉंग्रेसशीच आघाडी करावीशी का वाटते असा सवाल करून चिदंबरम यांनी त्यावर आश्चर्यही व्यक्त केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांशी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी संपर्क साधला होता पण आम्ही तो नाद नंतर सोडून दिला असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. या राज्यात कॉंग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणार काय असे विचारता ते म्हणाले की आमच्या उमेदवारांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेऊ. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू असेही चिदंबरम यांनी नमूद केले.