नाशिक – गेल्या आठवड्यात ‘आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो’ असे विधान काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यभर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा पटोले यांनी नाशिक येथे बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’, असे त्यांनी म्हंटले आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पटोले यांनी हे विधान केले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, देशाचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. जगाच्या पाठीवर देशाची ओळख बेरोजगारांचा देश म्हणून झाली आहे. महागाईत मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांचे प्रश्न वाढत चालले आहेत. केंद्र सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
हायकमांडनी झापल्यानंतर नाना पटोले यांनी गावगुंड मोदी समोर आणला, असा आरोप भाजपचे आमदार चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केला होता. त्यावर पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. त्यांची कशी हालत झाली आहे, हे सर्वांनी पाहिलेले आहे. भाजपवाल्यांवर लोक हसतात. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं, असं झाल्यानंतर आणखी काय बाकी राहिले आहे. आता या विषयांपेक्षा मी उपस्थित केलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी व छोट्या उद्योजक, तसेच गोरगरिबांचे प्रश्न यावर बोलले पाहिजे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले आहे, असे पटोले म्हणाले.