हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढायचे याकडे शेतकरी आता भर देताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक चणचण देखील दूर होण्यास मदत होत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गट शेतीचा प्रयोग करत चांगले उत्पादन काढले. पण बाजारात त्याला भाव मिळत नसल्याने त्यावर प्रक्रिया करण्याचा फंडा अवलंबिला, त्यानुसार आता सोयाबीन पासून गुलाब जामुन, पनीर, सोयास्टिक असे पदार्थ बनविले जात आहेत. पनीर दोनशे पन्नास रुपये किलो, तर गुलाब जामुन दोनशे रुपये किलो असा चांगला दरही मिळत आहे.
कळमनुरी तालुक्यातील कवडा हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गावाने पुरस्कार मिळविला. यावेळी झालेल्या मार्गदर्शनातून त्यांनी गट शेतीचा प्रयोग राबविला. गावातील 23 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येत जय बिरसा मुंडा शेतकरी गट स्थापन केला. या गटांनी जवळपास 27 एकर गट शेती केली. कमी खर्चात शेती करून आर्थिक उत्पादन मिळविण्यासाठी हा प्रयोग केला.
कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधांचा वापर न करता नैसर्गिक शेती केली. जैविके घरीच केली. आणि या शेतातील एका बॅगला सरासरी 11 क्विंटल उत्पादन आले. नैसर्गिक शेती करून उत्पादन मिळविले खरे पण परंतु बाजारात भाव नाही. पिकविलेले सोयाबीन पुण्याच्या लॅब मध्ये टेस्टिंग साठी पाठवले. प्रयोग शाळेच्या रिपोर्टनुसार नमुना अतिशय उत्कृष्ट असल्याचे सांगितले. परंतु सोयाबीनचे दर कोसळल्याने या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री काढले नाही. त्यांना पाणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली. त्यानुसार बिरसा मुंडा शेतकरी गटाने सोयाबीन पासून विविध पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला.
एक किलो सोयाबीन पासून बाराशे ग्रॅम पनीर तयार केले जाते, याच पनीरला 250 रुपये प्रति किलो दर मिळतो. एक किलो सोयाबीन पासून एक ते दीड किलो गुलाबजाम तयार होतात. त्याची विक्री दोनशे रुपये किलो प्रमाणे होते. सर्व परवाने मिळाल्याच्या नंतर बाजारपेठेत आम्ही धुमाकूळ घालू, अशी प्रक्रिया गटातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.