पुसेगाव, (प्रतिनिधी) – विसापूर, ता. खटाव येथील हुतात्मा सुभेदार श्रीरंग तात्याबा सावंत यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल यांना राष्ट्रपतींकडून मिळालेले शौर्यचक्र पदक बॉम्बे सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या संग्रहालयात ठेवण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या अधिकार्यांकडे नुकतेच सुपुर्द करण्यात आले.
राजस्थानमधील कोटा येथे जुलै 1986 अतिवृष्टी होऊन, पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (पुणे) येथे कार्यरत असलेल्या सुभेदार श्रीरंग सावंत यांनी पूरग्रस्त नागरिकांना वाचवून सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी सैनिकी मदतकार्यात भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी उल्लेखनीय साहस करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून एप्रिल 1988 मध्ये मरणोत्तर शौर्यचक्र बहाल करण्यात आले होते. गौरव केला. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना मे 1990 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
हे शौर्यचक्र 31 जानेवारीला सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे (सीओएस) आणि बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या कमांडंटकडे हुतात्मा सावंत यांचे सुपुत्र डॉ. सुधीर सावंत यांनी सुपुर्द केले. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या संग्रहालयात त्यांच्या कार्याचे व पदकाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. हुतात्मा सुभेदार श्रीरंग सावंत हे शौर्यचक्र सन्मानित झालेले खटाव तालुक्यातील एकमेव सैनिक आहेत.