सातारा – करोनाच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षात पाठ्यक्रमात 25 टक्के कपात करण्याचा राज्य शासनाचा आदेश असून शाळाप्रमुखांमार्फत पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेऊन त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्चपासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. यावर्षी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे विहित वेळेत पाठयक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला आहे. कमी करण्यात आलेला भागwww.maa.ab.in Am{U www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
मुख्याध्यापक, प्राचार्य, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांनी पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेऊन त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे, असे क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
या निर्णयानुसार अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील 22, माध्यमिक स्तरावरील 20 आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 59 अशा एकूण 101 विषयांचा इयत्तानिहाय, विषयनिहाय 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे. भाषा विषयामध्ये काही गद्य, पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जाऊ नयेत.
भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत. इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे. शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम, प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे. प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन- अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेऊन पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत निर्मिती केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे. शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.