वेल्हे -गॅस व इंधन दरवाढीमुळे सर्वत्र लोकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना आता रोज होणाऱ्या सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यात सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून दररोज व्यवसायासाठी पुण्यात येणाऱ्या रिक्षाचालकांना बसत आहे. वेल्हे व भोर तालुक्यातील अनेक रिक्षाचालक निवासी अडचणीमुळे गाव ते पुणे अशी रोज ये-जा करीत असतात.
मागील काही दिवसांपासून सीएनजीचे दर रोजच वाढत आहेत. मात्र, त्या पटीत भाडेवाढ होत नसल्याने रिक्षाचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शहरात राहणे परवडत नसल्यामुळे वेल्हे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक हे पुणे शहरात व्यवसायासाठी रोज गावावरून ये-जा करीत आपला व्यवसाय करतात.
परवडणारी यंत्रणा म्हणून सीएनजी रिक्षाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकांनी रिक्षा खरेदी केल्या. सकाळी गावावरून येताना दोन-तीन ग्राहक, दिवसभर शहरात व्यवसाय व संध्याकाळी गावाला जाताना पुन्हा दोन-तीन ग्राहक हे गणित जुळल्यामुळे अनेकांनी रिक्षा खरेदी करून रोजगारासाठी हा पर्याय निवडला. मात्र दररोज वाढणाऱ्या सीएनजीमुळे रिक्षाचालक पुरता हवालदिल झाला आहे.
रोज वाढणाऱ्या सीएनजीच्या दरामुळे सरकारने आम्हाला सांगावे व्यवसाय करायचा कसा.., जगायचे कसे..? आंदोलने केली तरी न्याय मिळणार नाही. महागाईने घर खर्च चालविणे कठीण झाले आहे.
गणेश दरडिगे, रिक्षा चालक
या दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसत असून, रोज किती व्यवसाय झाला हे कु टुंबात सांगताना देखील कमीपणाचे वाटते आहे. जे कमवायचे ते गॅस किंवा इंधनात घालवयाचे, असेच सध्या चालू आहे.
रमेश रसाळ, रिक्षा चालक