कमलेश गिरी
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आता राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान शोधू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपविरोधी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
तेलंगणचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाबद्दल नेहमीच नरमाईची भूमिका घेत असत. ते जर अर्थसंकल्पावर टीका करत असतील, तर त्यातून मिळत असलेले संकेत ओळखायला हवेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रातील सत्तेवरून दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात ते सामील झालेले असल्यामुळे भाजपकडून झालेला मोहभंग या पक्षाच्या कॉंग्रेस विरोधाची धार कमी करतो की नाही, हे पाहावे लागेल. तेलंगणमधील पक्षीय हित जोपासण्यासाठी कॉंग्रेसविरोधाची ही धार बऱ्याच वेळा अंध झाल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पातळीवर अशा टोकाच्या कॉंग्रेस विरोधाचा सर्वांत मोठा लाभ भाजपलाच झाला आहे.
तेलंगणमध्ये आपल्या पक्षाच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच त्यांनी सध्याच्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला कडवा विरोध दर्शविण्यासाठी एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांना अगदी जाहिरात करीत असल्याच्या थाटात पाठिंबा जाहीर केला. त्यांचा उल्लेख भाई म्हणून केला. भाजपचा विचार करायचे झाल्यास या पक्षाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेली शिवसेनाही हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी आजमितीस सोडत नाही. पंजाबात अकाली दलाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपची साथ सोडली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला पुरेशी गर्दीही जमणे दुरापास्त झाले आहे. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही अर्थसंकल्पावर कडाडून टीका करून भाजप आणि मोदींविषयीच्या नाराजीचे संकेत दिले आहेत.
चंद्रशेखर राव यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच अशी तक्रार ऐकू येत होती की, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला नसता तर त्यांनाही देशद्रोही म्हटले गेले असते. आपल्या विरोधकांना भाजपकडून शहरी नक्षलवादी वगैरे शेलक्या उपाध्या दिल्या जातात. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न विचारलेलाही त्या पक्षाच्या नेत्यांना सहन होत नाही. आता तर चंद्रशेखर राव हे पाच राज्यांमधील निवडणुकांना सेमीफायनल मानण्यासही नकार देत आहेत. त्यांच्या मते, भाजपला यश मिळाले तरी भाजपच्या जागा इतक्या कमी होतील की, त्या विजयाला काहीच अर्थ नसेल आणि अशा परिस्थितीत मोदी सरकारला हटविणे सहजशक्य असेल.
या सर्व वक्तव्यांचा थेट अर्थ असा आहे की, चंद्रशेखर राव हे आता राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान शोधू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपविरोधी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव हे अन्य काही नेत्यांसोबत तेलंगणमध्ये गेले होते. तत्पूर्वी चंद्रशेखर राव माकप आणि भाकपच्या नेत्यांना तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनाही भेटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ते लवकरच भेटणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत.
गेल्या तीन दशकांमध्ये देशाच्या राजकारणात आघाड्यांचीच भूमिका महत्त्वाची राहिली आणि तिसरी आघाडी स्थापन करण्याचेही अनेक प्रयत्न झाले, या पार्श्वभूमीवर या हालचालींकडे पाहायला हवे. मागील लोकसभा निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांनीही असा अयशस्वी प्रयत्न केला होता आणि पंजाबच्या मागील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसऐवजी तृणमूल कॉंग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचे ठसविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे.
चंद्रशेखर राव हे ममतांच्या दृष्टीस पडले असतील तर त्यांच्याविषयी ममतांचा दृष्टिकोन काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कॉंग्रेसबाबत खुद्द चंद्रशेखर राव यांचा दृष्टिकोन ममतांशी कितपत मिळताजुळता आहे, हेही महत्त्वाचे ठरेल. अनेक निरीक्षकांच्या मते, एक त्रस्त करणारा प्रश्न असा की, चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारला बंगालच्या उपसागराऐवजी हिंदी महासागरात किंवा अरबी समुद्रात बुडविण्याचा पर्याय का नाही निवडला? काही निरीक्षकांच्या मते बंगालच्या उपसागरात मोदी सरकार विसर्जित करण्याचा नारा देऊन ते ममता बॅनर्जी यांना खास संदेश देत आहेत. असे असेल तर पुढचा प्रश्न असा येतो की, कॉंग्रेसला दूर ठेवून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न झालाच तर सरकार आणि आपले नेतृत्व या बाबतीत ममतादीदी आपली महत्त्वाकांक्षा सोडतील का? जर नसतील तर त्यांच्या आणि चंद्रशेखर राव यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये संघर्ष होणार नाही का?
यापूर्वी महत्त्वाकांक्षांमध्ये झालेल्या संघर्षांनीच तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना चूड लावला आहे, हे वास्तव कोण नाकारू शकेल? अशा संघर्षांपासून बचावासाठी आधीच उपाययोजना केल्या गेल्या तर आणि तरच ही परिस्थिती टाळता येते. चंद्रशेखर राव असे करू शकतील का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप भविष्याच्या गर्भात आहे. परंतु विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत भाजप आपली घोडदौड कायम ठेवू शकते की नाही, यावर चंद्रशेखर राव यांच्या हालचालींचे भविष्य अवलंबून असेल.