Rahul Gandhi – उत्तरप्रदेशातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षां लक्षात घेऊन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उत्तरप्रदेशातील कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अंशु अवस्थी यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी कायमच जनहिताला प्राधान्य दिले आहे आणि संवेदनशील राजकारण केले आहे. राज्यात २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यूपी बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेऊन, भारत जोडो न्याय यात्रा १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत उत्तर प्रदेशात राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी ही यात्रा २६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये राहणार होती. परंतु परिक्षांमुळे त्यांनी यात्रेचा चार दिवसांचा कार्यक्रम कमी केला. प्रवक्त्याने सांगितले की, यापूर्वी, राहुल गांधी यांनी कोविड-19 काळात बंगालमधील त्यांच्या सभा रद्द केल्या होत्या.
उत्तर प्रदेशातील भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळापत्रकाचे तपशीलवार वर्णन करताना, अवस्थी म्हणाले की, ‘यात्रा १६ फेब्रुवारीला वाराणसीमार्गे राज्यात प्रवेश करेल आणि नंतर भदोही, प्रयागराज आणि प्रतापगड मार्गे १९ फेब्रुवारीला अमेठीला पोहोचेल.
अमेठी लोकसभा मतदारसंघातील गौरीगंज येथे एका जाहीर सभेला ते संबोधित करतील आणि दुसऱ्या दिवशी ही यात्रा रायबरेलीला पोहोचेल जिथून ती लखनौकडे निघेल आणि गांधींसह मोर्चातील सर्व सहभागी यात्री तेथे रात्रीचा मुक्काम करतील असे त्यांनी सांगितले.
ही यात्रा २१ फेब्रुवारी रोजी लखनऊहून उन्नावला पोहोचेल. ती उन्नाव शहर आणि शुक्लागंज मार्गे कानपूरमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ते कानपूर आणि हमीरपूर मार्गे झाशीला पोहोचेल, त्यानंतर त्याच दिवशी मध्य प्रदेशात प्रवेश करेल.