नवी दिल्ली – देशाने करोनाच्या दोन भीषण लाटांना तोंड दिलं. देशातील लाखो लोकांना करोनामुळं आपला जीव गमवावा लागला. आता करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट देशावर घोंघावत आहेत. त्यासाठी आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे. मात्र त्याचवेळी राजकीय नेत्यांकडून अजब दावे करण्याचे काम सुरूच आहे.
करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक दावे केले जातात. त्यात भाजप नेत्याच्या सल्ल्याची भर पडली आहे. लिंबाच्या रसाने करोना पळून जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. देवीसिंह भाटी अस या नेत्याच नाव असून ते माजी मंत्री आहेत.
“लिंबाच्या रसाचे दोन थेंब हे नाकामध्ये टाका आणि पाच सेकंद ठेवा, पाच मिनिटांनंतर कोरोना हळू हळू कमी होईल. दोन तासांनी तुम्हा ऑक्सिजन सपोर्टची देखील गरज भासणार नाही. तसेच रुग्णालयात असल्यास दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देखील मिळेल, असा दावा करताना अॅलोपथीमध्ये करोनावर उपचार नसल्याचं भाटी यांनी म्हटलं.
यावेळी भाटी यांनी अॅलोपथीबाबत बेछूट विधानं केलं. करोनाने अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयुर्वेद पद्धतीवर विश्वास ठेवण्याची गरज असून लिंबाचे दोन थेंब करोनावर मात करू शकतात. लिंबामध्ये सी व्हिटीमिन असतं. त्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, असंही भाटी यांनी म्हटलं आहे.