पुणे – महाराष्ट्र राज्य टंकलेखन-लघुलेखन, संगणक टायपिंग शासनमान्य संस्थांच्या संघटनेच्या विविध मागण्या तीन तीन वर्षांपासून प्रलंबित पडल्या आहेत. यावर तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त व संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करुन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत असा आग्रह संघटनेने थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेच धरला आहे.
राज्यात 4 हजार प्राशिक्षण संस्था कार्यरत आहेत. करोनामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, जनरल सेक्रेटरी हेमंत ढमढेरे यांनी गायकवाड यांची भेट घेवून निवेदनही दिले आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडील प्रलंबित टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करण्यात यावा. निकाल जाहीर होत नसल्याने बेरोजगार उमेदवारांना नोकऱ्या मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. यामुळे परीक्षांचे निकाल तातडीने लावावेत. संगणक टंकलेखन (जीसीसी-टीबीसी) अभ्यासक्रमाची सुधारित गुणपद्धत लागू करावी, सुधारित नियमावलीनुसार टंकलेखन, लघुलेखन, स्पेशल स्किल व संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शुल्क वाढीस मान्यता मिळावी, परीक्षा परिषदेकडून ऑनलाइन संगणक टंकलेखन परीक्षेचा डेमो उपलब्ध करुन देणे, परीक्षा परिषदेच्या सर्व परीक्षांना पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांचा प्रामुख्याने निवेदनात समावेश आहे.
जुलै ते डिसेंबर 2021 या सत्राच्या परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत. या सत्रात दोन लाख विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. परीक्षा वेळेत न झाल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहत आहेत. संस्थाचालक, प्राचार्य व निदेशक यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने परीक्षा घेण्याबाबतची अधिसूचना काढण्याबाबत आदेश जारी करावेत यासाठी संघटनेने भूमिका मांडली आहे.