पुणे – वेतन वेळेत मिळावे, यासाठी बालवाडी शिक्षिका व सेविकांसह कायम व रोजंदारी कामावरील शिपाई, रखवालदार यांनी मनपा प्रशासनाला तब्बल 21 वेळा पत्र लिहिले. पण, त्यावरही मागील दोन वर्षांत कार्यवाही होत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर मंगळवारी आंदोलन केले. शिक्षण विभागातील लेखनिक, बिल लेखनिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत असून, दरमहा सात तारखेला वेतन मिळणे आवश्यक असताना, प्रत्येकवेळी 20 ते 25 तारखेपुढेच ते दिले जात आहे. कर्जाचे हप्ते वेळेत न दिल्यास त्यांना दंड भरावा लागत आहे.
या प्रशासकीय कारभाराचा निषेध करण्यासाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. युनियनच्या संयुक्त चिटणीस कॉ. रोहिणी जाधव, कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कॉ. करुणा गजधनी शिक्षण विभागाचे विभागीय अध्यक्ष कॉ. अजित मेंगे, सचिव कॉ. ओंकार काळे कॉ. कलावती खाटपे, कॉ. प्रिया ठाकर, केतकीे मटाले, वनीता कानडे, जेष्ठ सल्लागार कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. प्रकाश हुरकडली तसेच हे पीडित कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. सुमारे 1,877 कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.