पुणे -पुणेकरांना गतिमान सेवा देण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचा प्रशासकीय कारभार मात्र कासवापेक्षाही कमी गतीचा असल्याचा प्रकार समोर आला आहे. पथ आणि पाणीपुरवठा विभागांत समन्वय नसल्याने नवे रस्तेही खोदले जात आहेत. या रस्त्यांची यादी पाणीपुरवठा विभाग पथ विभागास कळवत आहे. मात्र, ही यादी पोहचवण्यास तब्बल 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत आहे. ही यादी पोहचण्याआधीच पथ विभागाचे रस्तेही तयार होत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा आणि पथ विभागाचे कार्यालय एकाच मजल्यावर असून, त्याचे दरवाजे समोरासमोर आहेत. मात्र, तरीही प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी या फाइलींना 5 फुटांचे अंतर पार करण्यासाठी तीन आठवडे लागत आहेत.
काय आहे प्रकार?
रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 300 कोटींच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. कामासाठी शहराचे 6 पॅकेज करण्यात आली असून, 3 क्रमांकाच्या पॅकेजमध्ये कोथरुडचा समावेश आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी तर, या भागात समान पाणी योजनेचे काम करायचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कोठे खोदाई करायची आहे, याची यादी पथ विभागास 30 जानेवारीला पाठविली. मात्र, ती पथ विभागात 15 फेब्रुवारीला पोहचली आहे. पथ विभाग कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय पथ विभागाच्या बरोबर समोर आहे. त्यामुळे एका बाजूला या दोन विभागांत समन्वय नसल्याने नव्याने केलेले रस्ते खोदले जात असतानाच; दुसरीकडे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी जात असेल, तर महापालिकेचा कारभार गतिमान कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असा बसतोय फटका
एका बाजूला पाणीपुरवठा विभाग पथ विभागास खोदायच्या जागांची माहिती प्रस्तावाद्वारे पाठवित आहे. मात्र, हे प्रस्ताव एकाच इमारतीत असूनही सुट्या, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे 15 ते 20 दिवस एका विभागातून दुसऱ्या विभागात जात नाहीत. त्यामुळे, पथ विभागाने रस्ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले असून प्रस्ताव न आल्याने कोणतीही खोदाई नाही, असे गृहीत धरून रस्ते तयार केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण खोदाईचा प्रस्ताव पाठवला असून त्यावर काहीच उत्तर न आल्याने मंजुरी मिळेल असे गृहीत धरून पाणी पुरवठा विभाग रस्ते खोदत सुटले आहे. त्यामुळे नव्याने केलेले रस्ते खोदले जात असून पुणेकरांच्या पैशांचा चुराडा केला जात आहे.