पुणे – शरद मोहोळ याच्यावर ऑक्टोबरमध्ये देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यासाठी आरोपींबरोबर सह आरोपी असलेल्या दोन्ही वकिलांनी मिटिंग घेतली होती. तसेच वकील संजय उडान याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात
निष्पन्न झाले आहे. या दोन्ही वकिलांना खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, दोन्ही वकिलांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, नव्याने अटक केलेल्या दोन आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या अॅड. रवींद्र पवार आणि अॅड. संजय उडान या दोन आरोपी वकिलांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह गुन्हे शाखेने बुधवारी अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोघांनाही गुरुवारी (दि. ११) बिराजदार न्यायालयात हजर करण्यात आले. तांबे यांनी न्यायालयात सांगितले की आरोपी वटकर आणि शेडगे यांनी शस्त्र मध्यप्रदेशमधून मागवून खूनातील मारेकऱ्यांना दिली आहेत.
त्यामुळे शस्त्रे पुरविणाऱ्या वितरकाचा शोध घेणे बाकी आहे. तसेच यात एकूण ४ शस्त्रे मागविण्यात आली आहेत, त्यातील ३ शस्त्रे जप्त करण्यात आली. आणखी काही शस्त्रे पुरविली आहेत का?याचाही शोथ घ्यायचा आहे. अटक सहा आरोपींनी ऑक्टोबरमध्ये मोहोळवर हल्ला करायचा प्रयत्न केला. तो निष्फळ ठरला. त्यासाठी आरोपीबरोबर दोन्ही वकिलांनी पिरंगुटला मिटिंग घेतली होती. ते नेमके कुठे भेटले? आणखी कोण बरोबर होते? त्यांच्या मास्टर माईंड शोध घ्यायचा आहे.
या दोघांना तो कोण आहे? हे माहिती आहे. यातून मोठा कट समोर आला आहे. दोघांही वकिलांना मोहोळ याचा खून होणार याची माहिती होती. खूनानंतर जेव्हा आरोपींचा शोध घेतला जात होता. तेव्हा हे दोघेही वकील आरोपीसोबत होते. त्यांची मिटिंग झाली. तिथेच जुने सिमकार्ड टाकून दिले आणि नवीन सिमकार्डवरून एका व्यक्तीला फोन करण्यात आला आहे. गुन्हा संवेदनशील आहे. आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींचे वकील अॅड सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला की पोलिसांकडे कोणताही वेगळा पुरावा नाही. दोन्ही वकिलांनी सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही.
आरोपींचा दावा खोडला
सुनील तांबे यांनी आरोपींना सरेंडर करण्याचा वकिलांचा दावा खोडून काढला. मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम यांच्याबरोबर आरोपी वकिलांचे संभाषण झाले होते. त्यांनी आरोपी यांना नवी मुंबईला येऊन हजर करा किंवा तिथल्या भागातील इतर कोणत्याही पोलीस स्टेशनला हजर व्हा, असा सल्ला दिला होता. तरी ते विरुद्ध दिशेला का पळाले? कात्रज परिसरात दोन पोलीस चौक्या होत्या, नाकाबंदी लागली होती. कुणालाही सांगितले असते की हे या खुनाच्या केसमधील आरोपी आहेत, तर कुणीही अटक केली असती, असे सांगून सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी आरोपीना सरेंडर करण्याचा वकिलांचा दावा खोडून काढला.